विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली विनंती
मुंबई/प्रतिनिधी
राज्यभरातील कोवीड काळात विधवा झालेल्या शेतकरी महिलांना त्यांच्या गरजेनुसार येत्या खरीप आणि रब्बी हंगामामध्ये मोफत खते आणि बियाणे देण्यासंदर्भात लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल, असे प्रतिपादन कृषिमंत्री ना. दादा भुसे यांनी आज येथे केले. विधान भवनामध्ये विधान परिषद उपसभापती कार्यालयात आज ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी त्यांनी संवाद साधला. डॉ. गोऱ्हे यांच्या विनंतीवरून आज कृषी मंत्र्यांनी नीलमताईंची उपसभापती कार्यालयात भेट घेतली.
राज्यातील एकल महिलांना येत्या पावसाळ्यापूर्वी मोफत खते आणि बियाणे देण्याची मागणी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये होत आहे. कोविड काळातील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी राज्यातील जवळजवळ वीस जिल्ह्यांमध्ये डॉ. नीलम गोर्हे यांनी आढावा बैठक घेतली आहे.
या बैठकीमध्ये ग्रामीण भागातील शेतकरी व कोविड मधील एकल महिलाच्या कुटुंबांवर आलेल्या संकटाचा विचार करता, त्यांना बी- बियाणे आणि खते राज्य शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी विनंती त्यांनी आज कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. यावर त्यांनी याबाबत योग्य त्या कार्यवाही करण्याबाबत आश्र्वासित केले. राज्यातील एकल महिलांना दिलासादायक अशी बाब करण्यास कृषी विभागाने तयारी दर्शविल्याने डॉ. गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले आहे