मोडकळीस आलेल्या बसथांब्यांचा प्रवाशांना धोका : आवश्यक उपाययोजना राबविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
अकरा वर्षापूर्वी शहर आणि उपनगरात उभारण्यात आलेले बसथांबे खराब झाले असून, काही ठिकाणी असलेले बसथांबे मोडकळीस आले आहेत. बसथांब्यांच्या दुरुस्तीसह धोकादायक बसथांबे हटविण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. बसथांब्यावर प्रवाशांची गर्दी नेहमीच असते. त्यामुळे मोडकळीस आलेल्या बसथांब्यांचा धोका प्रवाशांना निर्माण झाला आहे.
जागतिक कन्नड संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी बसथांबे निर्माण करण्यात आले होते. महापालिकेच्या वतीने अकरा वर्षापूर्वी बसविण्यात आलेले पत्र्याचे बसथांबे सडले आहेत.
काही ठिकाणी हे बसथांबे मोडकळलेले आणि वाकलेल्या स्थितीत आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत नवीन बसथांब्यांची उभारणी करण्यात आली आहे. पण जुन्या बसथांब्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने कोणतीच कारवाई केली नाही. जुन्या बसथांब्यांच्या छताचे पत्रे गंजल्याने पावसाळय़ात पाणी गळत असते. तसेच आसन व्यवस्था पूर्णपणे खराब झाली आहे. सध्या राणी चन्नम्मा चौक, नवीन न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, सरदार मैदानाजवळ तसेच कॉलेज रोड अशा विविध ठिकाणी असलेले हे बसथांबे प्रवाशांना धोकादायक ठरत आहेत. स्मार्ट सिटी आणि महापालिका योजनेंतर्गत अनेक विकासकामे राबविली जात आहेत. पण जुने बसथांबे हटवून नवीन बसथांब्यांची उभारणी करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
बसथांब्यांमुळे परिवहन मंडळाला प्रवासी मिळतात. पण परिवहन मंडळाकडून बसथांब्यांच्या विकासाच्या दृष्टीने कोणतीच पाऊले उचलली जात नाहीत. महापालिकेकडून घरपट्टी भरून घेतली जाते. त्यासोबत घरपट्टीवर परिवहन कराची आकारणी करून परिवहन मंडळाला सुपूर्द केली जाते. पण परिवहन मंडळाकडून शहरवासियांसाठी कोणत्याच सुविधा दिल्या जात नाहीत. परिवहन मंडळ केवळ नफा मिळविण्यासाठी कार्यरत आहे का? असा मुद्दा प्रवासी उपस्थित करीत आहेत. मोडकळीस आलेल्या बसथांब्यांच्या ठिकाणी नवीन बसथांबे उभारणीसाठी महापालिका, स्मार्ट सिटी आणि परिवहन मंडळाने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.