विस्तरीकरणाला मुहूर्त मिळेना, जुन्या बेडवरील पत्रे दुरूस्त होईना : सात महिन्यांपासून 12 बेडचे पत्रे खरा : मनपा प्रशासनाकडून दुरूस्ती, नवीन शेडचे काम कासवगतीने : शेणी, लाकडाचाही तुटवडा, कर्मचाऱ्यांचीही संख्या अपुरी
विनोद सावंत/कोल्हापूर
‘विस्तारीकरणाला मुहूर्त मिळेना आणि जुन्या बेडवरील पत्रे दुरूस्त होईना’, अशी स्थिती पंचगंगा स्मशानभूमीची झाली आहे. गेल्या सात महिन्यांपासून पत्रे दुरूस्त केले नसल्याने 12 बेड वापरविना पडून आहेत. स्मशानभूमीतील समस्या महापालिकेकडूनही गांभिर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येत आहे. दुरुस्तीसह नवीन कामाची टेंडर प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. एकंदरीतच बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारी पंचगंगा स्मशानभूमीच बेवारस झाल्याचे चित्र आहे.
महापालिकेची पंचगंगा स्मशानभूमीसह बापटकॅम्प, कदमवाडी आणि कसबा बावडा येथे स्मशानभूमी आहेत. मात्र, पंचगंगा स्मशानभूमीत सर्वाधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. गेल्या काही दिवसांपासून येथील बेडवरील पत्र्याचे शेड खराब होऊ लागली आहेत. 33 नंबर बेडवरील पत्रा कधी लोकांच्या डोक्यात कोसळले याचा नेम नाही. बेड क्रमांक 1 ते 12 बेडचे पत्रे खराब असल्याने वापरविना आहेत. परिणामी अपुऱया बेडमुळे अंत्यसंस्कार केल्यानंतर दुसऱया दिवशीच रक्षाविसर्जन केले जात आहे.
आठ दिवस पुरेल इतकीचे लाकडे, शेणी
दोन महिन्यांपूर्वी स्मशानभूमीतून लाकडे नेली असून कट करून आणलेली नाही. 550 रुपयास एक हजार शेणी खरेदी केल्या जातात. ठेकेदाराने 100 रुपयांची वाढ केली असून याच्या मान्यतेची फाईल मंजूरीच्या प्रतीक्षेत आहे. परिणामी आठ दिवस पुरेल ऐवढीच लाकडे आणि शेणी आहेत. पूर्वीच्या तुलनेत लाकडचा वापर कमी करण्यात आला आहे.
शहराबाहेरील मृतदेहांचा स्मशानभूमीवर ताण
पंचगंगा स्मशानभूमीत रोज शहराबाहेरील सात ते आठ मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. यामध्ये उचगांव, मुडशिंगी, पाचगांव, गिरगांव, आर.के.नगर, वडणगे, कळंबा गावांचा समावेश असून याच ताण स्मशानभूमीवर पडत आहे.
12 बेडचे शेड दुरूस्तीस आणखीन महिना लागणार
12 बेडचे शेड जुने झाल्याने नव्यानेच करावे लागणार असून 53 लाखांच्या कामाची निविदा काढली आहे. महिन्याभरात शेड उभारले जाईल. आमदार फंडातून कार्यालया शेजारीच नवीन शेड उभारण्यात येणार असून अडीच कोटींचे इस्टीमेंट केले असून निविदा प्रक्रिया सुरू आहे. -नारायण भोसले, उपशहर अभियंता, मनपा
गॅसदाहिनी धुळखात
कोरोना मृतांवर स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनीच अंत्यसंस्कार केले. यामध्ये गॅस दाहिनीचा वापर झाला. आता चित्र बदलले आहे. पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याचा हट्ट धरला जात असल्याने गॅसदाहिनी धुळखात पडून आहे.
कर्मचारी भरतीकडेही दुर्लक्ष
स्मशानभूमीतील कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर नवीन भरती झालेली नाही. कोरोनामध्ये रोजंदारीवरील कर्मचाऱयांनाही काढून टाकले आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सध्या कार्यरत असणाऱ्यांना सुट्टी दिवशीही कामावर यावे लागत आहे. किमान 3 कर्मचारी तातडीने भरण्याची गरज आहे.
पंचगंगा स्मशानभूमीतील स्थिती
रोज मृतदेहांवर अंत्यसंस्कार-25 ते 30
एकूण बेड-43
खराब बेड-12
सध्या कर्मचारी -12
आवश्यक कर्मचारी-15