दोन वर्षांपासून नानावाडी भाग अंधारात
प्रतिनिधी /बेळगाव
नानावाडी-सावगाव रोडवर दोन वर्षांपूर्वी पथदीप बसविण्यात आले खरे. परंतु अद्याप ते कार्यान्वित करण्यात आलेले नाहीत. नानावाडी परिसरात बऱयाच ठिकाणी अशीच परिस्थिती असल्यामुळे नागरिकांना अंधारातून वाट काढत ये-जा करावी लागते. वेळच्या वेळी कर भरून देखील महानगरपालिकेकडून पथदीप सुरू करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांमधून मनपाच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.
नानावाडी परिसरात झपाटय़ाने रहिवासी वसाहत वाढत आहे. परंतु या मानाने महानगरपालिका सुविधा पुरविण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. डेकोरेटिव्ह पथदीप बसवून दोन वर्षे होत आली तरी अद्याप ते सुरू करण्यात आलेले नाहीत. यामुळे नानावाडी ते सावगाव रोड पूर्णपणे अंधारात आहे. सावगाव रोडवर अंगडी इंजिनियरिंग कॉलेजसह इतर शाळा-कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांची नेहमी ये-जा असते. तसेच सावगाव रोडचे नागरिकही याच रस्त्याने वाहतूक करतात.
पथदीप नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघात घडत आहेत. नानावाडी परिसरात अनेक लहान-मोठी हॉटेल व व्यवसाय असल्यामुळे या व्यवसायांनाही पथदीप बंद असल्याने फटका बसत आहे. त्यामुळे डेकोरेटिव्ह पथदीप लवकर सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.