सहय़ाद्रीनगर रस्त्यावर धोकादायक विद्युतखांब : लोकप्रतिनिधींची दररोज फेरी असूनही कानाडोळा
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत हनुमाननगर येथील विविध रस्त्यांचा विकास करण्यात आला आहे. या अंतर्गत सहय़ाद्रीनगरला जोडणाऱया रस्त्याशेजारी सायकल ट्रक, फुटपाथ अशा विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा असलेले विद्युतखांब हटविण्याकडे हेस्कॉमचे दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्यावरून लोकप्रतिनिधीची फेरी दररोज असते, पण त्यांनीदेखील याकडे कानाडोळा केल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
या रस्त्याचा विकास करून सुशोभिकरण करण्यात येत आहे. रस्त्याच्या विकासासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली होती. रस्त्यावर असलेल्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम तसेच रस्त्याशेजारी दोन्ही बाजूंनी फुटपाथ आणि सायकलस्वारांसाठी सायकल ट्रक निर्माण करण्यात आले आहे. हा रस्ता गणेश मंदिरापासून बॉक्साईट रोडला जोडणारा आहे. विविध वसाहतींना जाण्यासाठी नागरिक रस्त्याचा वापर करीत असतात. वर्दळीचा रस्ता असल्याने पथदीप बसवून हा रस्ता सुसज्ज करण्यात आला आहे. मात्र या रस्त्यावर असलेले विद्युतखांब हटविण्याकडे हेस्कॉमचे दुर्लक्ष झाले आहे. संपूर्ण रस्त्यावरील अडथळे हटवून रस्ता चकाचक करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने प्रयत्न चालविले आहेत. पण विद्युतखांब हटविण्याची जबाबदारी झटकली आहे.
विद्युतखांब हटविण्याची झटकली जबाबदारी
पण रस्त्यावर वाहनधारकांना अडथळा ठरणारे विद्युतखांब हटविण्यासाठी प्रयत्न अपुरे पडत आहेत. या परिसरात पथदीप नसल्याने अंधार पसरलेला आहे. अशातच विद्युतखांब अडचणीचे ठरत आहेत. खांब हटविण्यात यावेत, अशी मागणी सातत्याने करण्यात आली. मात्र याबाबत कोणतीच दखल घेण्यात आली नाही. परिणामी वाहनधारकांना हे विद्युतखांब जीवघेणे ठरत आहेत. या रस्त्यावरून लोकप्रतिनिधी दररोज ये-जा करीत असतात. पण त्यांनीदेखील धोकादायक विद्युत खांब हटविण्यासाठी कोणतीच दखल घेतली नाही. या ठिकाणी अनर्थ घडल्यानंतरच ते विद्युतखांब हटविण्यात येणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे तातडीने विद्युतखांब हटविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.