पुणे : भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. महात्मा गांधी हे कायम खेडय़ांकडे चला असा विचार मांडत होते, परंतु पंडित नेहरू यांनी या विचारांची हत्या केली. युरोप आणि अमेरिकेच्या विचारांनी प्रभावी झालेल्या पंडित नेहरूंनी खेडय़ांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे खेडी भकास झाली आणि शेतकरी उध्वस्त झाला. महात्मा गांधी यांची हत्या माथेफिरू नथुराम गोडसे यांनी केली ही बाब निषेधार्ह आहे. परंत, महात्मा गांधी यांच्या विचारांची हत्या पंडित नेहरु यांनी केली हे स्विकारावेच लागेल, असे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी म्हटले आहे..
पुण्यातील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूटसतर्फे आयोजित सहाव्या युवा संसदमध्ये आयडिया ऑफ इंडिया या सत्रामध्ये सदाभाऊ खोत बोलत होते. ते म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकऱयांनी कष्ट करून देशाचा विकास केला, परंतु इंडियातील उद्योजकांनी शेतकऱ्यांची पिळवणूक करून देशाची लुबाडणूक केली. अशीच व्यवस्था कायम राहिली तर देशामध्ये समान विकास कसा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करणारा विकास आपण निर्माण केला पाहिजे.
अधिक वाचा : प्राचार्यांना मारहाण करणं भोवलं; आ. बांगर यांच्यासह 30 ते 40 जणांवर गुन्हा
बारामतीच्या घराणेशाहीवर बोलताना ते म्हणाले, सामाजिक कामाच्या नावाखाली बारामतीकर गेल्या अनेक वर्षांपासून एकाच कुटुंबाची सत्ता अनुभवत आहेत. परंतु हे कुटुंब मात्र आपण सामाजिक काम करत आहोत असा देखावा करत स्वतःचेच खिसे भरत आहे. कुटुंबाच्या मालकीचे साखर कारखाने, शैक्षणिक संस्था निर्माण करून या कुटुंबाने बारामतीकरांना वाऱ्यावर सोडले. यामुळे बारामतीकर घराणेशाहीच्या राजकारणाला वैतागले आहेत, अशी टीका खोत यांनी यावेळी केली.