प्रा. टी. जी. सीतारामन यांचे प्रतिपादन : व्हीटीयूचा 22 वा दीक्षांत सोहळा
बेळगाव : विज्ञान व तंत्रज्ञानात दिवसागणिक बदल होत आहेत. त्यामुळे बाहेरील जगाशी समरूप असणारे शिक्षण विद्यार्थ्यांना देणे ही काळाची गरज आहे. हीच गरज ओळखून नवीन शैक्षणिक धोरण (एनईपी) लागू करण्यात आले आहे. एनईपीमुळे शिक्षण क्षेत्रात अनेक बदल घडले असून शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ही शिक्षण पद्धती उपयुक्त ठरेल, असे विचार दिल्ली येथील ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनचे चेअरमन प्रा. टी. जी. सीताराम यांनी मांडले. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 22 वा पदवीदान समारंभ शुक्रवारी व्हीटीयूच्या सभागृहात पार पडला. यावेळी प्रा. सीतारामन बोलत होते. त्यांनी एआयसीटीईद्वारे चालू असणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. व्यासपीठावर राज्यपाल थावरचंद गोहलोत, कुलगुरु प्रा. एस. विद्याशंकर, उद्योजक सचिन सबनीस, उद्योजक एम. लक्ष्मीनारायण, मूल्यमापन विभागाचे रजिस्ट्रार प्रा. टी. एन. श्रीनिवास, रजिस्ट्रार बी. ई. रंगास्वामी व विभागप्रमुख उपस्थित होते. राज्यपाल थावरचंद गेहलोत म्हणाले, शिक्षणामुळे कौशल्य मिळते, आणि मिळालेल्या कौशल्याने सफलता. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर शिक्षणाची गरज ही लागतेच. आपली प्राचीन शिक्षण पद्धती ही जगाला आदर्शवत होती. सध्या शिक्षण क्षेत्रात नवीन शैक्षणिक धोरण आणून बदल करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्यामुळे पुढील काही दिवसात भारत विश्वगुरु होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बेळगावच्या उद्योजकाला डॉक्टरेट
पदवीदान समारंभात एकूण तिघांना डॉक्टरेट पदवी देण्यात आली. बेळगावमधील उद्योजक व बेलगाम फेरोकास्टचे संचालक सचिन सबनीस यांच्या उद्योग क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना डॉक्टरेट देण्यात आली. त्याचबरोबर व्याबको इंडिया लि. चे चेअरमन एम. लक्ष्मीनारायण यांनाही डॉक्टरेट पदवी देऊन गौरविण्यात आले. तर टोयाटो किर्लोस्कर कंपनीचे व्हा. चेअरपर्सन विक्रम किर्लोस्कर यांना मरणोत्तर डॉक्टरेट पदवी देण्यात आली. सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांना राज्यपाल थावरचंद गोहलोत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कुलगुरु प्रा. एस. विद्याशंकर यांनी उपस्थितांचे स्वागत करत व्हीटीयूच्या नव्या उपक्रमांची माहिती दिली. या पदवीदान समारंभामध्ये 51 हजार 905 विद्यार्थ्यांना बीई, 9 जणांना बी प्लॅन, 1 हजार 32 जणांना बी आर्क, 4 हजार 279 जणांना एमबीए, 2 हजार 28 जणांना एमसीए, 82 जणांना एमआर पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यभरातील विविध कॉलेजचे प्राध्यापक उपस्थित होते.
बेंगळूरच्या मुरलीची सुवर्ण कमाई
यंदाच्या पदवीदान समारंभात बेंगळूर येथील मुरली या सिव्हिल इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याने तब्बल 18 सुवर्णपदकांची कमाई केली. आई-वडिलांनी दिलेला प्रतिसाद व घेतलेली मेहनत यामुळे हे यश मिळाल्याचे त्याने सांगितले. पहाटे 4 वाजल्यापासून अभ्यासासाठी वेळ दिला. कोणतीही गोष्ट असाध्य नाही. फक्त आपल्या मेहनतीत सातत्य असायला हवे, असे त्यांनी सांगितले.