गावकऱ्यांचा म. ए. समितीस उत्स्फूर्त पाठिंबा, एकच उमेदवार देण्याची मागणी
खानापूर : मणतुर्गा विभाग कायमच समितीच्या पाठीशी खंबीरपणे राहिला आहे. हीच परंपरा यापुढेही कायम ठेवणार आहोत. समितीने एकच उमेदवार द्यावा. बंडखोरी होणार नाही याची दक्षता घ्यावी. सीमाप्रश्न सुटेपर्यंत प्रत्येक घर आणि प्रत्येक माणूस समितीशी एकनिष्ठ राहिल, यात शंका नाही, अशी ग्वाही ता. पं. माजी सदस्य बाळासाहेब शेलार यांनी मणतुर्गा येथे झालेल्या जागृती सभेवेळी बोलताना व्यक्त केली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे ज्येष्ठ नेते वासुदेव पाटील होते. प्रारंभी दळवी यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश व समितीच्या सुरू असलेल्या जागृती दौऱ्यासंदर्भात माहिती दिली. तालुक्यात राष्ट्रीय पक्षानी मराठी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेत आहेत. यामुळे नवीन तसेच तरुण मतदारांची जबाबदारी वाढलेली आहे. समितीच्या त्यागाचा इतिहास राष्ट्रीय पक्षाच्या आमिषांना गाढून समितीचा भगवा निश्चित मानाने फडकेल, असे वक्तव्य यशवंत बिरजे यांनी केले.
यावेळी अध्यक्ष गोपाळ देसाई, भूविकास बँकेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, शंकर गावडा, रुक्माण्णा झुंजवाडकर, मऱ्याप्पा पाटील आदींनी आपले विचार व्यक्त केले. प्रल्हाद मादार यांनी आभार मानले. बैठकीला सुधीर पाटील, सदाशिव दळवी, नारायण पाटील, सुभाष पाटील, गुंडू गुरव, फोंडू गुंडपीकर, शिवाजी पाटील, मारुती दळवी, प्रेमानंद पाटील, महादेव पेडणेकर, अमृत शेलार, प्रदीप देसाई, ईश्वर बोबाटे, तुकाराम देवलत्तकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.