आगामी काळात उत्पादन निर्मिती कारखाने स्थापणार
वृत्तसंस्था / मुंबई
एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी नेस्ले आगामी काळामध्ये भारतामध्ये 5 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे. कंपनीचे जवळपास भारतामध्ये 9 प्लांट असून नव्या ठिकाणी निर्मिती कारखाने स्थापन करण्याचा इरादा कंपनीने व्यक्त केला आहे.
2025 पर्यंत कंपनी 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक टप्प्याटप्प्याने करण्यासाठी तयार झाली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क स्निडर यांनी ही माहिती दिली आहे. गुंतवणुकीसोबत अधिग्रहण व विलीनीकरणाच्या प्रस्तावांचेही आपण स्वागत करू, असेही त्यांनी सांगितले आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून नवे निर्मिती कारखाने उभारले जाण्यासोबत नव्या उत्पादनांची श्रेणी ग्राहकांकरता सादर करणे अशा योजना कंपनीने आखल्या आहेत.
110 वर्षापासून भारतात…
या नव्या गुंतवणुकीच्या माध्यमातून निर्मिती कारखाने तयार झाल्यानंतर अनेक भारतीयांना रोजगाराची संधी कंपनीतर्फे उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या 110 वर्षापासून नेस्लेची उत्पादने भारतामध्ये उपलब्ध आहेत. 2020 मध्ये 2 हजार 600 कोटीची गुंतवणूक करण्याची घोषणा कंपनीने केली होती.