वृत्तसंस्था/ आइंडहोव्हन (नेदरलँड्स)
भारतीय पुरुष हॉकी संघ येथे त्यांच्या ‘एफआयएच प्रो लीग’ सामन्यात नेदरलँड्सकडून 2-3 अशा फरकाने पराभूत झाला. डच संघाकडून ड्युको टेलगेनकॅम्प (6 वे मिनीट), बोरिस बुर्खार्ड (40 वे मिनीट) आणि टीजेप होडेमेकर्स (42 वे मिनीट) यांनी, तर भारताकडून संजय (17 वे मिनीट) आणि गुरजंत सिंग (45 वे मिनीट) यांनी गोल केले.
बुधवारी येथे नेदरलँड्सकडूनच भारत 1-4 असा पराभूत झाला होता, परंतु त्यानंतर अर्जेंटिनावर 3-0 असा विजय मिळवल्याने या सामन्यात वाढीव आत्मविश्वासानिशी संघ उतरला होता. जरी भारत नेदरलँड्सविरुद्ध पुन्हा पराभूत झाला असला, तरी 15 सामन्यांतून 27 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. भारताने सुऊवातीच्या टप्प्यापासूनच डचवर आक्रमण करण्याचा विचार करून चेंडूवर अधिक ताबा मिळविला. यावेळी अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरचे जवळजवळ गोलात रूपांतर केले होते. मात्र नेदरलँड्सने शिकस्त करून तो प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही.
परंतु ही कोंडी ड्युको टेलगेनकॅम्पने फोडताना भारतीय गोलरक्षक पी. आर. श्रीजेशला चकविले. त्यानंतर नेदरलँड्सने आक्रमणे सुरूच ठेवली, पण पहिल्या सत्राच्या शेवटच्या मिनिटांत श्रीजेशने दोन शानदार फटके अडविल्याने आणखी गोल नोंदविता आले नाही. भारत पहिल्या ब्रेकच्या वेळी 0-1 ने पिछाडीवर होता. दुसऱ्या सत्राच्या सुऊवातीलाच संजयने जवळून गोल करत भारताला बरोबरी साधून दिली आणि नेदरलँड्सला चोख उत्तर दिले. काही क्षणांनंतर, अभिषेक आणि मनदीप सिंग या दोघांनीही प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्राला धडक दिली. पण डच खेळाडूंनी गोल होऊ दिला नाही.
पुढे दोन्ही संघ गोल नोंदविण्याच्या संधी शोधत राहिले. तथापि, कोणालाही कोंडी फोडता आली नाही आणि दुसऱ्या सत्राच्या अखेरी 1-1 अशी बरोबरी कायम राहिली. तिसऱ्या सत्रात डच संघाने भारताची आक्रमणे बऱ्यापैकी थोपवून धरली आणि नंतर पाहुण्यांवर दबाव टाकण्यास सुऊवात केली. तिसरे सत्र संपण्यास चार मिनिटे बाकी असताना नेदरलँड्सने उजवीकडून एक झटपट चाल केली आणि बोरिस बुर्खार्डने श्रीजेशला चकवत 2-1 अशी आघाडी वाढविली. काही मिनिटांनंतर डच संघाने अनेक पेनल्टी कॉर्नर्स मिळविले आणि त्यातील तिसऱ्या पेनल्टी कॉर्नरवर होडेमेकर्सने गोल नोंदविला.
तिसऱ्या सत्राच्या अखेरीस नेदरलँड्सने भारतावर 3-1 अशी आघाडी घेतली. अंतिम सत्रात गुरजंत सिंगला खेळवले असता त्याने पहिले मिनीट संपण्यापूर्वीच 3-2 अशी आघाडी कमी केली. त्यानंतर बरोबरी साधण्यासाठी मनदीप आणि इतर खेळाडूंनी भरपूर प्रयत्न केले, परंतु डच संघाने त्यांना गोल करू दिला नाही. भारताचा पुढील सामना अर्जेंटिनाविऊद्ध होणार आहे.