ऑनलाईन टिम / नवी दिल्ली
नागरिकत्व न मिळाल्याने 800 पाकिस्तानी हिंदूंनी भारत सोडला, असे एका वकिलांच्या संघटनेने म्हटले आहे. राजस्थानमधील सुमारे 800 पाकिस्तानी हिंदू, पाकिस्थानच्या धार्मिक छळाला कंटाळून भारतात आले होते. पाकिस्तानात होणाऱ्या धार्मिक अत्याचाराच्या आधारावर नागरिकत्व मिळवण्यासाठी ते भारताकडे त्यांनी अर्ज केला होता.
भारतातील पाकिस्तानी अल्पसंख्याक स्थलांतरितांच्या हक्कासाठी लढणार्या सीमांत लोक संघटना (SLS) यांनी ही माहिती उजेडात आणली. भारताच्या आश्रयाला आलेले पाकिस्तानी हिंदु नागरिकत्वाच्या अर्जात कोणतीच प्रगती झाली नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्यापैकी बरेच लोक 2021 मध्ये पाकिस्तानला परतले.
गृह मंत्रालयाने (MHA) 2018 मध्ये ऑनलाइन नागरिकत्व अर्ज प्रक्रिया सुरू केली. ज्यामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील हिंदू, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन आणि बौद्धांना नागरिकत्व देण्यासाठी सात राज्यांतील 16 जिल्हाधिकारी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यासाठी नियुक्त केले होते.
मे 2021 मध्ये, MHA या संस्थेने गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या पाच राज्यांमधील आणखी 13 जिल्हाधिकाऱ्यांना नागरीकत्व कायदा, १९५५ कलम 5 (नोंदणी ) आणि कलम 6 (नैसर्गिकीकरण) अंतर्गत सहा समुदायांतील अर्जदारांना नागरिकत्व प्रमाणपत्रे देण्याचे अधिकार दिले होते.
“ परत गेलेल्या पाकिस्थानी हिंदुंचा वापर पाकिस्तानच्या सरकारी एजन्सी भारताची बदनामी करण्यासाठी केला जातो. त्यांना प्रसारमाध्यमांसमोर आणले जाउन पहिल्यापेक्षा वाईट वागणूक दिली जाते”. असे सिमांत लोक संघटनेचे अध्यक्ष हिंदु सिंग सोढा, यांनी सांगितले.