ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
दिल्लीतील राजिंदर नगर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये आपचे दुर्गेश पाठक विजयी झाले. त्यांनी भाजपच्या राजेश भाटिया यांचा ११,००० मतांनी पराभव केला. मतमोजणी सुरू झाल्यापासूनच, AAP ने आघाडी मिळवली होती, दुपारनंतर या आघाडीत वाढ झाली.
दुर्गेश पाठक यांच्या विजयानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजिंदर नगरच्या लोकांचे आभार मानले. आपल्या संदेशात ते म्हणाले की, राजिंदरनगरच्या लोकांनी गलिच्छ राजकारणाचा पराभव केला असून आपच्या चांगल्या कामाला पाठिंबा दिला आहे. या विजयानंतर आपच्या समर्थकांनी राजिंदर नगर येथील मतमोजणी केंद्राबाहेर एकच जल्लोष करत आपला विजय साजरा केला.
राघव चढ्ढा हे पंजाबमधून राज्यसभेवर निवडून आल्यामुळे त्यांनी आमदरकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे राजेंद्रनगरची जागा रिक्त झाली होती. आपचे खासदार राघव चढ्ढा यांनीही मतदारांचे आभार मानले. ते म्हणाले, “राजिंदर नगर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी पुन्हा एकदा ‘आप’ला प्रेम आणि आशीर्वाद दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पोटनिवडणुकीतील विजय हा ‘केजरीवाल यांच्या मॉडेल ऑफ गव्हर्नन्स’वर शिक्कामोर्तब आहे.”