ऑनलाईन टिम / नवी दिल्ली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आगामी अयोध्या दौऱ्यावरून उत्तर प्रदेशमध्ये वाद निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करणारे तसेच उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मंगळवारी अयोध्येतील सर्व मंदिरांचे प्रमुख साधू आणि मुख्य पुजारी, महंत यांची बैठक बोलावून रणनीती आखली.
ब्रिजभूषण शरण सिंह यांनी गेल्या आठवड्यातच 2008 मध्ये उत्तर भारतीय स्थलांतरित लोकांविरुद्ध केलेल्या हिंसक विधानाबद्दल राज ठाकरे यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. तसेच मनसे प्रमुखांनी माफी मागितली तरीही 5 जून रोजी त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“माफी मागण्याची वेळ निघून गेली आहे. राज ठाकरे यांना अयोध्येत येण्यापासून रोखण्याचा आमचा निर्धार कायम आहे. आणि आता माफी मागितली तरी राज ठाकरेंना त्यांच्या आगमनाची तारीख बदलावी लागेल” असे ब्रिजभूषण सिंग यांनी म्हटले आहे.
सिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “राज ठाकरे ५ जूनला आल्यानंतर त्यांचा विरोध करण्याची रणनीती ठरवण्यासाठी आम्ही अयोध्येतील सर्व मंदिरांच्या महंतांची बैठक बोलावली घेतली आहे. जोपर्यंत ते माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना परवानगी न देण्याचा निर्णय सर्व संतांनी घेतला आहे,”