वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजधानी दिल्लीच्या विविध भागांमध्ये अतिक्रमण आणि अवैध निर्मितीच्या विरोधात महापालिकेची मोहीम सुरू आहे. या कारवाईसंबंधी दिल्लीत सत्तारुढ असलेल्या आम आदमी पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी दिल्ली महापालिकेच्या कारवाईवरून आप आमदारांची बैठक घेतली. दिल्लीत महापालिकांकडून अनेक ठिकाणी बुलडोझर चालविले जात आहेत, आम्ही देखील अतिक्रमणाच्या विरोधात आहोत. परंतु ज्याप्रकारे कारवाई केली जातेय ते चुकीचे असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
दिल्लीत 80 टक्के वसाहती अनियमित (मान्यता नसलेल्या) आहेत. मग 80 टक्के दिल्ली तोडण्यात येणार का? लोकांना संधी देखील दिली जात नसल्याचे चित्र आहे. 40 वर्षांपासून राहत असलेले लोक स्वतःच्या घराची कागदपत्रे दाखवत आहेत, परंतु त्यांचे म्हणणेच ऐकून घेतले जात नाही. हा प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
दिल्लीत 1700 अनियमित वसाहती असून त्यात 50 लाखांहून अधिक लोक राहतात. तर 13 लाख लोक झोपडपट्टय़ांमध्ये राहत आहेत. या सर्वांचा निवारा भाजपशासित महापालिका तोडत असून हे आम्ही सहन करणार नाही. भाजपशासित महापालिकांच्या या कारवाईला विरोध करण्याचा आणि जनतेसोबत उभे राहण्याची सूचना आप आमदारांना केली असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे.