असदुद्दिन ओवैसी यांचे अतिवादग्रस्त विधान, भाजपचा जोरदार प्रत्युत्तर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतातील मुस्लीमांचा मोगलांशी संबंध नाही, हे खरे असले तरी मोगल बादशहांच्या पत्नी कोण होत्या असा वादग्रस्त प्रश्न एमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी उपस्थित केला आहे. काही मोगल सत्ताधीशांच्या पत्नी हिंदू धर्माच्या होत्या, याकडे लक्ष वेधण्याचा त्यांचा हा प्रयत्न आगीत तेल ओतल्यासारखा असून त्यांनी धर्मांधतेचा कळस गाठला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांच्या या ताज्या विधानांवर व्यक्त होत आहे. आपल्या मंगळवारच्या भाषणात ओवैसी यांनी आणखी अनेक अतिरंजित विधानेही केली आहेत.
भारताला समृद्ध बनविण्याचे काम मुस्लीमांनी केले, असा विपर्यस्त दावा त्यांनी केला. तसेच मदरसांमध्ये देशभक्ती शिकविली जाते, असेही वक्तव्य त्यांनी केले. संघात जाणारे लोक अशिक्षित असतात. मुस्लीमांच्या वंशावर लक्ष ठेवण्यातून संघ आपली हीन भावना प्रगट करतो, इत्यादी मुक्ताफळेही त्यांनी उधळली आहेत.
आक्रमक प्रत्युत्तर
भारतातील मुस्लीमांचे पूर्वज हिंदूच आहेत, हे ओवैसींनी लक्षात ठेवावे. मुस्लीम येण्यापूर्वी भारत समृद्ध होता, म्हणून त्याला लुटण्यासाठी मुस्लीम आक्रमक येथे आलेले होते. भारताची समृद्धी ही इतिहासप्रसिद्ध आहे. ती मुस्लीमांमुळे निर्माण झालेली नाही. इस्लामच्या जन्मापूर्वीपासून भारत समृद्ध आणि संपन्न देश आहे, असे प्रत्युत्तर ओवैसींना अनेक नेटीझन्सनी दिले आहे.
धर्मांधता वाढविण्याचा प्रयत्न
ओवैसी हे धर्मांध नेते असून सामाजिक सलोखा बिघडविण्यासाठी विपर्यस्त आणि विकृत विधाने करीत आहेत. त्यांना हिंदू-मुस्लीम दंगली घडवायच्या आहेत. त्यामुळे ते ऐतिहासिक सत्यांना फाटा देऊन आपले मुस्लीम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी जोरदार टीका त्यांच्या विधानांनंतर होऊ लागली आहे.
भाजपचाही पलटवार
मुगलांच्या पत्नी कोण होत्या याची उठाठेव करण्यापेक्षा ओवैसींनी भारतातील मुस्लीमांचे पूर्वज कोण होते, ते एकदा तपासून पहावे. म्हणजे भारतीय मुस्लीमांच्या मुळापर्यंत त्यांना जाता येईल. या देशात हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न कोणी केला तर तो सहन केला जाणार नाही. बदलेल्या काळाची जाणीव ओवैसींसारख्या धर्मांध नेत्यांनी ठेवावी अन्यथा ते मुस्लीमांचीच हानी करतील. ते मुस्लीमांसाठी भस्मासूर ठरत आहेत, असा जोरदार पलटवार भाजपने केला आहे.