मुंबई हल्ला, पठाणकोट हल्ल्याचीही केली निंदा, दौरा फलद्रूप झाल्याचे भारताचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा टोकिओ दौरा क्वाड देशांच्या सहकार्यवृद्धीसाठी तसेच भारताशी या देशांचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी फलदायी ठरला, असे प्रतिपादन भारताच्या विदेश विभागाने केले आहे. क्वाडच्या परिषदेसाठी या दौऱयाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारच्या बैठकीत क्वाड कडून जागतिक दहशतवादाचा तीव्र निषेध करण्यात आला असून भारतात मुंबई आणि पठाणकोट येथे पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांचीही कठोर निंदा परिषदेकडून एकमताने करण्यात आली. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांच्या प्रमुखांशी पंतप्रधान मोदींनी मनमोकळी चर्चा करुन द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल उचलले आहे. भारताने एकंदरीत या दौऱयासंबंधी समाधान व्यक्त केले असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दहशतवाद मग तो कोणत्याही प्रकारचा असो, किंवा कोणत्याही कारणांसाठी असो तो संपविला जाणे आवश्यक आहे. त्याचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन केले जाऊ शकत नाही. दहशतवाद आणि हिसंक कट्टरतावाद ही जगासमोरची महत्वाची आव्हाने असून त्यांचा बिमोड एकत्रितरित्या करणे आवश्यक आहे. 2008 मध्ये भारतात मुंबई शहरावर झालेला दहशतवादी हल्ला आणि पठाणकोट येथील सैनिकी तळावर हल्ला हे निषेधार्ह असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी क्वाड परिषदेतील सदस्य देश एकमेकांना सहकार्य करणार आहेत, अशी घोषणा सोमवारी या परिषदेच्या बैठकीत एकमुखाने करण्यात आली.
क्वाडने दहशतवादचा स्पष्ट निषेध करणे हे भारतासाठी अनुकूल संकेत आहेत, असे मानण्यात येत आहे. विशेषतः मुंबई आणि पठाणकोट हल्ल्याचा स्पष्ट निषेध होणे हे भारतासाठी महत्वाचे असून पाकिस्तानसाठी हा इशारा असल्याचेही तज्ञांचे मत आहे. भारताच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय महत्वाचे हे चिन्ह आहे.
युक्रेनवरही चर्चा
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धासंबंधीही क्वाड देशांनी चर्चा केली. तथापि, त्यावर प्रगट भाष्य करण्यात आले नाही. प्रामुख्याने चर्चा भारत-प्रशांतीय क्षेत्र व्यापार आणि पुरवठा साखळय़ांसाठी मुक्त कसे राखण्यात येईल यावर करण्यात आली. भारताने यासंबंधी आपले पूर्ण सहकार्य असेल, असे स्पष्ट केले.
ऑस्ट्रेलियाशी चर्चा फलदायी
ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान अँटोनी अल्बानेस यांचीही पंतप्रधान मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी या चर्चेसंदर्भात समाधान व्यक्त केले. सर्वंकष धोरणात्मक भागीदारीच्या चौकटीत दोन्ही नेत्यांनी आतापर्यंतच्या सहकार्याचा आढावा घेतला. यात व्यापार आणि गुंतवणूक या मुद्दय़ांचाही समावेश होता. तसेच हैड्रोजन इंधन निर्मिती, पुनउ&पयोगी ऊर्जानिर्मिती, शिक्षण, तंत्रज्ञान हस्तांतरण, शस्त्रास्त्रांचे संयुक्त उत्पादन, विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्य, कृषीसंशोधन, क्रीडा आणि सांस्कृतिक आदानप्रदान, जनतासंपर्क इत्यादी क्षेत्रांमध्ये दोन्ही देश एकमेकांना महत्वपूर्ण सहकार्य करतील, असे ठरविण्यात आले आहे.
कोणाहीही नाही असे सहकार्य भारताशी
जगात कोणाशीही नाही असे सहकार्य भारताशी केले जाईल, असे आश्वासक प्रीतपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडन यांनी क्वाड परिषद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींशी झालेल्या चर्चेनंतर केले आहे. भारताशी व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण, आरोग्य विषयक कार्यक्रम, उत्पादन इत्यादी क्षेत्रांमध्ये सहकार्याचा वेग वाढविण्यात येईल, असेही अमेरिकेने सूचित केले आहे. याच संदर्भात भारताशी लसनिर्मिती सहकार्यासंबंधी करार करण्यात आला आहे.