केजरीवाल यांच्याकडून मान यांचे अभिनंदन
चंदीगढ / वृत्तसंस्था
पंजाबचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री विजय सिंगला यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांनी भ्रष्टाचार केल्याने त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सिंगला यांना त्वरीत अटकही करण्यात आली. ही कारवाई केल्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंबाजचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांचे अभिनंदन केले आहे.
आरोग्य विभागाशी संबंधित एका प्रकल्पाच्या निमिर्तीची अनुमती देण्यासाठी सिंगला यांनी प्रकल्प खर्चाच्या एक टक्का लाच मागितली होती, असा आरोप आहे. एका ध्वनिफितीमुळे हा प्रकार उघडकीस आला. तसेच सिंगला यांनी ‘शुक्राणा’ हा सांकेतिक शब्द कमिशनसाठी उपयोगात आणला होता. या धनिफितीच्या पुराव्याच्या आधारावर मान यांनी कारवाई करुन सिंगला यांना अटक केली. कमिशन आपल्या पुतण्याला द्या असे सिंगला यांनी या कंत्राटदाराला सांगितल्याचे या ध्वनिमुद्रणावरुन स्पष्ट होत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अधिकाऱयामुळे पर्दाफाश
आारोग्य विभागाच्या एका अधिकाऱयाने मंत्री सिंगला यांच्या या व्यवहाराची माहिती मुख्यमंत्री मान यांना दिली. त्यामुळे पद्धतशीर सापळा रचण्यात आला. मुख्यमंत्री मान यांनी या अधिकाऱयाकडे या भ्रष्ट व्यवहाराचा स्पष्ट पुरावा मागितला. तेव्हा या अधिकाऱयाने या प्रकल्पाच्या कंत्राटदाराला हाताशी धरुन मंत्र्याशी झालेला संवाद ध्वनिमुद्रीत करुन घेतला. त्या ध्वनिमुद्रणाच्या आधारावर पुढील कारवाई करण्यात येऊन मंत्र्याला अटक करण्यात आली आहे.
एका आठवडय़ापूर्वीच…
आपल्या विभागात भ्रष्टाचार शून्य टक्क्याच्या पातळीवर आणण्यात येईल. भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा आदर्श आपण निर्माण करणार आहोत, अशी घोषणा सिंगला यांनी एका आठवडय़ापूर्वीच एका कार्यक्रमात बोलताना केली होती. तथापि. त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच ते स्वतःच भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकले. आता त्यांचे राजकीय भवितव्य उध्वस्त होण्याची वेळ आली आहे. त्यांच्या विरोधात कठोर करवाई होणार असून त्यांना प्रदीर्घ कारावास भोगावा लागण्याची शक्यता आहे, असे अनेक राजकीय तज्ञांचे मत आहे.
आमच्या मंत्र्यावरही कारवाई
आम आदमी पक्ष भ्रष्टाचाराला थारा देणारा पक्ष नाही. वेळप्रसंगी आम्ही आमच्याच नेत्याच्या विरोधातही कारवाई करु शकतो, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली. मान यांनी केलेल्या त्वरित कारवाईमुळे आपल्या डोळय़ात पाणी आले, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.