नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रामपूर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर आता केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचे राजकीय भवितव्य काय असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांना मंत्रिमंडळाऐवजी आता उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार म्हणून संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. मुख्तार अब्बास नक्वी हे तीन वेळा राज्यसभा सदस्य राहिले आहेत. त्यांनी 1998, 1999 आणि 2009 मध्ये तीन वेळा लोकसभेची निवडणूकही लढवली होती.
रामपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने घनश्याम लोधी यांना उमेदवारी दिली आहे. राज्यसभेचे तिकीट नाकारलेले केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनाही रामपूरमधून उमेदवारी दिली जाऊ शकते, असे आतापर्यंत मानले जात होते. नक्वी यांनी मात्र याचा इन्कार केला. नक्वी यांचा राज्यसभेचा कार्यकाळ जुलैमध्ये संपत असताना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत वेगवेगळी मते व्यक्त होत आहेत. मंत्रिपदी कायम राहण्यासाठी कोणत्याही सदनाचा सदस्य असणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांना सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ मंत्रिमंडळात राहता येणार नाही. साहजिकच जुलैदरम्यान होणाऱया उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी पक्ष त्यांना उमेदवार बनवू शकतो. भाजपचा अल्पसंख्याक चेहरा म्हणून त्यांचा प्रचार केला जाईल, असा तर्क व्यक्त होत आहे.