राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /वास्को
शिक्षण हे सुसंस्कारीत माणुस निर्माण करण्यासाठी असावे. समाजाचे हित साधणारे आणि समाजाची गरज पूर्ण करणारे शिक्षण असावे. ते केवळ उद्योगांची गरज भागवणारे नसावे. शिक्षणाचे दाखले मिळवणे ही जीवनाची सार्थकता नव्हे. देशाला कशा प्रकारच्या शिक्षणाची गरज आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अभ्यास करावा लागेल. या अभ्यासासाठी शैक्षणिक संस्थांनी परिषदा घडवून आणण्याची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे वसाहतवादी शिक्षणापासून भारतीय समाजाला परावृत्त करण्याचा प्रयत्न आहे असे प्रतिपादन हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले.
झुआरीनगरातील मुरगाव शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षारंभानिमित्त संस्थेच्या महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला राज्यपाल राजेंद्र आर्लेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या व्यासपिठावर संस्थेचे अध्यक्ष प्रा. माधवराव कामत, उपाध्यक्ष प्रा. भास्कर नायक, संस्थेच्या प्राचार्य डॉ. मनस्वी कामत व सौ. अनघा आर्लेकर उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला आमदार दाजी साळकर, नगरसेविका शमी साळकर, संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत जोशी, प्रा. ललिता जोशी, प्रा. हरीश्चंद्र नागवेकर, प्रा. राजीव हाजीरनीस, डॉ. मारीया रॉड्रिक्स यांच्यासह एमईएस परीवारातील व परीवाराशीसंबंधीत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल आर्लेकर यांच्या हस्ते समई प्रज्वलीत करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी यावेळी बोलताना एमईएस संस्थेचे एक माजी विद्यार्थ्यांनी या नात्याने या संस्थेत कसा घडलो. प्रा. माधवराव कामत व त्यांच्या सहकाऱयांचे आपल्याला मिळालेले मार्गदर्शन याचाही उल्लेख त्यांनी थोडक्यात केला. एमईएसच्या प्रारंभीच्या काळातील आठवणीही त्यांनी सांगितल्या. जीवनाचे तत्वज्ञान शिकवणारे एम.एस. कामत सारखे प्राचार्य या संस्थेला लाभले होते. त्यांचे संस्कार आपल्यावरही झाले असे आर्लेकर म्हणाले. संस्कार आणि सामाजीक भान ही शिक्षणाची गरज आहे. आपण केवळ शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी किंवा दाखले मिळवण्यासाठी शिक्षण घेत असतो का असा प्रश्न करून समाजात चांगली माणसे निर्माण करणे हासुध्दा शिक्षणाचा मुख्य उध्देश असायला हवा. शिक्षणात मोठमोठी गुणवत्ता प्राप्त केलेल्यांचे पुढे समाजात सहसा अस्तित्व जाणवत नसते. समाजाला त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतात. जीवनातील सार्थकता त्या दाखल्यांमध्ये नसते. केवळ उद्योगांची गरज भागवणारे नव्हे तर समाजाची गरज भागवणारे शिक्षण आज मिळायला हवे. रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार पुरवणारे नागरिक निर्माण व्हायला हवेत. आम्ही आतापर्यंत ब्रिटीशांची वसाहतवादी शिक्षण पध्दत चालवीत आलेलो आहोत. आम्हाला भारतात कशा प्रकारच्या शिक्षण पध्दतीची आवश्यकता आहे हे आपण ओळखायला हवे. वसाहतवादी शिक्षणाला लगाम घालायला हवा. त्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा बारकाईने अभ्यास करावा. वसाहतवादी शिक्षणपध्दत खंडीत करण्याचा एक प्रयत्न म्हणजेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. या नव्या धोरणाच्या अभ्यासासाठी शैक्षणिक संस्थांनी परिषदा आयोजित कराव्यात असे आवाहन राज्यपाल आर्लेकर यांनी या कार्यक्रमात केले.
कोणत्याही शैक्षणिक संस्थेचे यश हे त्यांच्या माजी विद्यार्थ्यांच्या यशावर अवलंबून असते. या विद्यार्थ्यांना संघटीत करायला हवे. त्यांचे सशक्त संघटन संस्थेला भरभराटीकडे नेण्यासाठी साहाय्यक ठरत असते असे प्राचार्य भास्कर नायक यावेळी म्हणाले. गोव्यातील युवक शिक्षित व्हावेत या उध्देशानेच भाऊसाहेब बांदोडकरांनी गावागावात शाळा निर्माण केल्या होत्या. अण्णा जोशी यांनीही पन्नास वर्षांपूर्वी अशाच उध्दात हेतूने एमईएसची स्थापना केली होती. अण्णांचे या संस्थेसाठीचे योगदान इतिहासात कायम राहणार आहे. आज शिक्षण क्षेत्रात वेगवान बदल होत आहे. काळाप्रमाणे आपल्यालाही बदलावे लागणार आहे. अन्यथा आपण मागे पडू असा सुचक सल्ला प्राचार्य भास्कर नायक यांनी दिला.
प्रा. माधवराव कामत यांनी यावेळी बोलताना एमईएसचे विद्यार्थी सर्व क्षेत्रात चमकलेले आहेत. कला, क्रिडा, उद्योग, शिक्षण, समाजकारण, राजकारण इत्यादी क्षेत्रात एमईएसचे विद्यार्थी कार्यरत असल्याचे सांगून त्यांनी राज्यपल राजेंद्र आर्लेकर यांच्या जडणघडणीबाबतही माहिती दिली.
एमईएसच्या प्राचार्य डॉ. मनस्वी कामत यांनी उपस्थितांचे स्वागत करताना एमईएस महाविद्यालयाच्या मागच्या पन्नास वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला. प्रा. डॉ. चंपा परब यांनी सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त संस्थेने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.