राज्यपाल कार्यालयाकडून स्पष्ट : घटकराज्यदिनी होणार पायाभरणी
प्रतिनिधी /पणजी
राज्याची विद्यमान राजभवन इमारत अबाधित ठेऊनच त्याच परिसरात नवीन राजभवन प्रकल्प उभारण्यात येणार आहे, असे राज्यपाल कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
येत्या रविवारी 30 मे रोजी राज्याच्या घटकराज्यदिनी नवीन राजभवन इमारतीची पायाभरणीसाठी करण्यात येणार आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याहस्ते ही पायाभरणी होणार आहे. दोनापावला येथे राजभवन म्हणून वापरात असलेली सध्याची इमारत सुमारे 400 वर्षे जुनी आहे. त्यामुळे या इमारतीच्या जवळच्या परिसरातच राजभवनसाठी नवीन इमारत बांधण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. मात्र सदर प्रस्तावास समाजातील अनेक घटकांकडून जोरदार विरोध होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सदर जुनी इमारत जैसे थे ठेऊनच नवीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे, असे राज्यपाल कार्यालयाने म्हटले आहे.
नवीन राजभवनच्या बांधकामावर काही लोकांच्या आक्षेपावर स्पष्टीकरण देताना राज्यपाल कार्यालयाने, विद्यमान राजभवन पॅलेसची रचना 400 वर्षांहून अधिक जुनी आहे. त्याची मोठय़ा प्रमाणात झीज झाली आहे. त्यातून आतापर्यंत कोटय़वधींचे नुकसान झाले आहे. साबांखाकडून देखभालीवर दरवषी लाखो रुपये खर्च केले जात आहेत, असे म्हटले आहे.
राजभवनच्या गरजांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात बदल झाला आहे. त्यासाठी आधुनिक सोयी आणि सुविधांसह अधिक जागा आवश्यक आहे, असेही राज्यपाल कार्यालयाने म्हटले आहे.
त्यामुळे कॅम्पसमध्ये उपलब्ध असलेल्या जागेवर राजभवन प्रकल्प बांधण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीदरम्यान राजभवन आणि राज्यपालांच्या सचिवालयाची सध्याची इमारत अबाधित राहील. त्यात कोणत्याही प्रकारे अडथळा आणला जाणार नाही वा त्यात बदल करण्यात येणार नाही, अशी माहिती राज्यपाल कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.