नोंदणीकृत संस्थेचा अन्नसुरक्षा विभागाकडून आग्रह : अन्नातून विषबाधा होण्याच्या राज्यात घटना
बेळगाव : महाप्रसादाचे सेवन केल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्याच्या दुर्दैवी घटना बेळगाव जिल्ह्यासह राज्यात इतर ठिकाणीही घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अन्नसुरक्षा विभागाच्या आयुक्तांनी प्रसादासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. अन्नसुरक्षा विभागाकडे नोंदणी असणाऱ्या संस्थांकडूनच महाप्रसाद बनवून घ्यावा, असे आदेश असले तरी याची अंमलबजावणी करताना अन्नसुरक्षा विभागाच्या नाकीनऊ येणार आहे. अन्नातून विषबाधा झाल्याच्या घटना काही नवीन नाहीत. केवळ बेळगाव शहरातच 370 हून अधिक सार्वजनिक मंडळे आहेत. यापैकी 200 मंडळे तरी गरिबांच्या पोटात चार घास जावेत, या उदात्त हेतूने दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन करतात. प्रत्येक मंडळाकडून किमान 3 ते 4 हजार भाविकांना महाप्रसादाचे वितरण केले जाते. अनवधानाने अन्नात भेसळ झाल्यास विषबाधा होण्याची शक्यता असते. याचीच खबरदारी म्हणून अन्नसुरक्षा विभागाने राज्यात नवीन नियमावली जाहीर केली आहे.
प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे अशक्य
भाविकांच्या आरोग्याची काळजी घेऊनच हा निर्णय घेण्यात आला असला तरी प्रत्यक्षात याची अंमलबजावणी करणे शक्य नाही. कारण, केवळ मोजकेच अधिकृत स्वयंपाकी असे आहेत ज्यांची नोंदणी अन्नसुरक्षा विभागाकडे आहे. एकाच वेळी 20 ते 25 मंडळांचा महाप्रसाद होत असल्याने प्रत्येक ठिकाणी नोंदणीकृत स्वयंपाकी पाठविणे शक्य नसते.त्यामुळे याची अंमलबजावणी करणे अशक्य आहे. त्याचबरोबर भाविकांनी दिलेल्या तुटपुंज्या देणगीतून मंडळाचे कार्यकर्ते महाप्रसादाचे आयोजन करतात. त्यामुळे मोठा खर्च करून स्वयंपाकी आणणे सर्वच मंडळांना शक्य नसते. बऱ्याच ठिकाणी गल्लीतील नागरिकांकडूनच स्वयंपाक केला जातो. त्यामुळे अन्नसुरक्षा विभागाच्या या निर्णयाची बेळगावमध्ये तरी अंमलबजावणी होणे तसे शक्य नाही.