ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी रविवारी हिमाचल प्रदेशच्या भाजप सरकारवर निशाणा साधला. या वर्षाच्या अखेरीस हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभुमीवर राज्याच्या राज्य विधानसभेत फुटीरतावादी खलिस्तानी चळवळीशी संबंधित झेंडे सापडल्याने राजकीय वातावरण तापले असून हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून हे एक भ्याड कृत्य असल्याचे म्हटले आहे.
आपल्या ट्विटर हँडलवर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया य़ांनी भाजपवर आरोप केला आहे. ते म्हणाले की, ‘धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश विधानसभेच्या बाहेर खलिस्तानचे झेंडे लावणे हे पूर्ण भाजपचे अपयश आहे. “संपूर्ण भाजप” एका गुंडाला वाचवण्याची धडपड करत आहे. खलिस्तानी तिथे झेंडे लाऊन निघून गेले. जे सरकार विधानसभा वाचवू शकत नाही, ते जनतेला कसे वाचवणार. हा हिमाचल प्रदेशच्या सन्मानाचा प्रश्न आहे, देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. भाजप सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे,” असे ‘आप’ नेत्याने भाजपवर हल्ला चढवला.
हिमाचल प्रदेशाच्या विधानसभा संकुलाच्या मुख्य गेट क्रमांक एकच्या बाहेरील बाजूस हे झेंडे लावण्यात आले होते. आता प्रशासनाने हटवले असून असेंब्ली कॉम्प्लेक्सच्या भिंतींवर खलिस्तान समर्थनाचे नारे देखील लिहिलेले आढळले होते.