भारतीय पुरातत्व विभागाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिपादन
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीतील कुतुबमिनार हे भारतीय पुरातत्व विभागाच्या नोंदीनुसार एक स्मारक आहे. ते पूजास्थान नव्हते. त्यामुळे तेथे पूजा करण्यास अनुमती दिली जाऊ शकत नाही, असे प्रतिपादन भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने दिल्लीतील साकेत न्यायालयात करण्यात आले आहे. तशा अर्थाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. आता या प्रकरणी 9 जूनला न्यायालय आपला निर्णय देणार आहे.
कुतुबमिनारची निर्मिती 27 हिंदू आणि जैन मंदिरांची साधनसामग्री उपयोगात आणून झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. तथापि, त्यासाठी ही मंदिरे पाडण्यात आली होती का, हे स्पष्ट होत नाही. हे कोणत्याही धर्माचे पूजा अथवा प्रार्थना स्थळ कधी नव्हते. त्यामुळे ते पूजापाठ करण्याचा अधिकार दिला जाऊ शकत नाही, असा युक्तीवाद पुरातत्व विभागाच्या वतीने करण्यात आला.
युक्तीवाद पूर्ण
कुतुबमिनार ही इमारत हिंदू आणि जैन मंदिरे नष्ट करुन त्यांचीच साधनसामग्री उपयोगात आणून बांधण्यात आली आहे. या मनोऱयाच्या आतील बाजूचे सर्वेक्षण केल्यास ही बाब स्पष्ट होईल. या इमारतीच्या आतील बाजूस हिंदू देवदेवतांच्या मूर्ते आणि हिंदू मंदिरांचे खांब इत्यादी साधने स्पष्टपणे दिसून येतात. तशी छायाचित्रेही उपलब्ध आहेत. त्यामुळे येथे हिंदूंना पूजापाठ करण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका काही हिंदूंच्या वतीने सादर करण्यात आली आहे. हिंदू बाजूने आपला युक्तीवाद पूर्ण केला आहे. तसेच मुस्लीम बाजूनेही आपला युक्तीवाद मंगळवारी पूर्ण केला. आता 9 जूनला आदेश दिला जाणार आहे.
निर्मिती कोणी केली ?
कुतुब मिनार ही हिंदूंचीच इमारत असून तिची निर्मिती राजा विक्रमादित्याने 800 वर्षांपूर्वी केली होती. ती कुतुबुद्दिन ऐबक याने केली नव्हती. त्याने फक्त या इमारतीचे नाव बदलले होते. हिंदूंच्या काळात या मनोऱयाचा उपयोग सूर्याचा अभ्यास करण्यासाठी केला जात होता, अशी माहिती पुरातत्व विभागाचे माजी अधिकारी धरमवीर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.
मंदिरांशी मिनाराचा नेमका संबंध कोणता?
पुरातत्व विभागाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हिंदू आणि जैन मंदिरांच्या साधनसामग्रीचा उपयोग करुन कुतुब मिनारची बांधणी करण्यात आली असा उल्लेख आहे. पण ही मंदिरे पाडविली होती का हे स्पष्ट होत नाही अशी टिप्पणी केलेली आहे. त्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण मंदिरे ‘पाडविल्या’शिवाय किंवा नष्ट केल्याशिवाय त्यांची साधनसामग्री अन्य इमारत बांधण्यासाठी कशी उपयोगात आणली जाऊ शकते ? असा प्रश्न निर्माण होईल, असे तज्ञांचे मत आहे. समजा, ही मंदिरे मोडकळीला आलेली होती, किंवा हिंदू अथवा जैन या मंदिरांचा त्या काळात उपयोग करत नव्हते, असे जरी मानले तरी त्यांची साधनसामग्री उपयोगात आणून आपली इमारत बांधण्याचा अधिकार परकीय आक्रमकांना कोणी दिला होता ? की त्यांनी तो बळकावला होता ? असेही प्रश्न निर्माण होतात. हिंदू किंवा जैनांनी तशी अनुमती त्याकाळी परकीय आक्रमकांना दिली होती का, आणि तसा पुरावा उपलब्ध आहे काय, असाही प्रश्न आहे.