मुंबई: येत्या दोन आठवड्यात राज्यातील महानगरपालिका नगरपंचायत आणि जिल्हा परिषद मधील निवडणूक कार्यक्रम जाहीर करा. असे आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. त्यावर आज राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणूक सप्टेंबरमध्ये तर ग्रामपंचायत, जिल्हापरिषदेच्या निवडणूक ऑक्टोंबर मध्ये घेण्यास परवानगी द्यावी. असा विनंती अर्ज सुप्रीम कोर्टात सादर केला आहे.
राज्यातल्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात आज राज्य निवडणूक आयोगाकडून अर्ज सादर करण्यात आला आहे. महापालिका, नगर पंचायतीच्या निवडणुका सप्टेंबर मध्ये तर जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याची परवानगी द्या अशी विनंती या अर्जाद्वारे केली आहे. त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. तसेच पावसाळ्याचा विचार करता राज्य निवडणुक आयोगाची विनंती कोर्ट मान्य करण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला पावसाळ्यानंतरच मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाच्या अर्जानुसार, जून महिन्याच्या अखेरीपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वॉर्ड रचना आणि इतर प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करू, असं आयोगाने कोर्टात सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे. पण त्यानंतर पुढची प्रक्रिया ऐन पावसाळ्यात पूर्ण करावी लागेल. त्यात काय काय प्रशासकीय अडचणी आहेत, हे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे. पावसाळ्यात मतदान झाल्यास मतदानाची टक्केवारी कमी होऊ शकते, अशी भीती देखील या अर्जात निवडणूक आयोगाकडून व्यक्त केली गेली आहे.