उदयपूर हत्या प्रकरण ः अजमेरमधील अत्यंत सुरक्षित तुरुंगात हलविले
वृत्तसंस्था/ उदयपूर
टेलर कन्हैयालाल यांच्या दोन्ही मारेकऱयांचे प्रकरण उदयपूर जिल्हा न्यायालयाने एनआयएकडे वर्ग केले आहे. दोन्ही मारेकरी आणि हत्येशी निगडित दस्तऐवज आणि पुरावे ताब्यात देण्यात यावेत अशी मागणी करणारा अर्ज एनआयएने जिल्हा न्यायालयात केला होता. या दोघांनाही जयपूरमध्ये एनआयए न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. एनआयए या मारेकऱयांच्या कोठडीची मागणी करणार आहे. प्रकरण हस्तातंरित झाल्याने एनआयए आता गौस मोहम्मद आणि रियाज यांची कोठडी मिळवून चौकशी करणार आहे.
याचदरम्यान उदयपूरमध्ये संचारबंदी असूनही शुक्रवारी दुपारी जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले. तर कन्हैयालाल यांचे मारेकी गौस मोहम्मद आणि रियाज यांना उदयपूरमधून अजमेर येथील अत्यंत सुरक्षित तुरुंगात हलविण्यात आले आहे. तर हत्येच्या तपासावरून एनआयए पथकाने गुरुवारी रात्री कानपूर येथे अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. मारेकऱयांकडून हस्तगत दस्तऐवजातून कानपूर कनेक्शन समोर आल्यावर ही कारवाई झाली आहे. तर शुक्रवारी चौथ्या दिवशी राजस्थानात इंटरनेट बंद आहे. हिंसा होऊ नये म्हणून कलम 144 लागू करण्यात आले आहे.
तर हत्येच्या कटात सामील आणखी 2 आरोपींना गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. मोहसीन आणि आसिफ अशी त्यांची नावे आहेत, तर 3 जणांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणी शस्त्रास्त्र कायद्यांतर्गतही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राजस्थान सरकारने मोठी कारवाई करत उदयपूरचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस महानिरीक्षकांना हटविले आहे.
सीकर, दौसा, बाडमेर समवेत अनेक छोटय़ा शहरांमध्ये बंदची हाक शुक्रवारी देण्यात आली. या पार्श्वभूमीवर पोलीस अत्यंत सतर्क आहेत. तर 2 जुलै रोजी कोटा आणि अलवरमध्ये बंद पुकारण्यात आला आहे.
या हत्याप्रकरणी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप होत आहे. तसेच सरकारवर देखील जोरदार टीका होत आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी कन्हैयालाल यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्याच्या काही तासांनीच उदयपूरचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांची बदली करण्यात आली आहे.