नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांची घोषणा : कळंगूट,कांदोळी,हडफडे,पर्रा,पणजी,म्हापसा,वास्को,मुरगाव,फोंडाचासमावेश
प्रतिनिधी /पणजी
कळंगूट, कांदोळी, हडफडे, पर्रा, पणजी, म्हापसा, वास्को, मुरगांव, आणि फोंडा हे बाहय़ विकास आराखडे (ओडीपी) रद्द करण्यात आल्याची घोषणा नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी केली असून सर्वांना विचारात घेऊन नव्याने बनविण्यात येणार आहेत. त्यासाठी अभ्यास समिती स्थापन केल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. या घोषणेमुळे बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
बाहय़ विकास आराखडय़ासंबंधी अनेक तक्रारी येत असून न्यायालयात खटलेही चालू आहेत. या कामात पारदर्शकता हवी, असे सांगताना ओडीपी रद्द करून नव्याने बनवणे हाच त्यावर उपाय असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार कार्य
नगर नियोजन खात्याचे मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी ज्या विश्वासाने आपल्याकडे जबाबदारी दिली तेव्हा ओडीपी संबंधी झालेला घोळ सुधारण्याची सूचना केली होती. शहराचे आणि खेडे, गावाच्या विकासाचे नियोजन योग्य पद्धतीने करण्यासाठी नव्याने विचार झाला पाहिजे, असे ते म्हणाले.
संघटनांशी चर्चेमुळे त्रुटी आल्या नजरेस
क्रेडाय, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अर्किटेक्ट, इंजिनियर्स आसोसिएशन, सीआयआय, इन्स्टिटय़ूट ऑफ टाऊन प्लॅनर्स अँड इंजिनियर्स या संघटनांच्या प्रतिनिधीशी चर्चा केल्यानंतर ओडीपीतील अनेक त्रुटी नजरेस आल्या. त्या दुरुस्त करण्यास अजूनही वेळ सरलेली नाही. आताच त्यात सुधारणा करण्यास प्रारंभ केल्यास डिसेंबरपर्यंत लोकाभिमूख व सर्वांना रुचेल असा आराखडा सर्वांना विचारात घेऊन तयार करता येईल, असे ते म्हणाले.
आर्किटेक्ट, इंजिनिअर्सचा असणार सहभाग
नगर नियोजन मंडळाची पुनर्स्थापना करताना, आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, टाऊन प्लॅनर्स. सीआयआय अशा संघटनांच्या प्रतिनिधींना मंडळावर स्थान देणे आवश्यक आहे. पीडीएवर ते खास निमंत्रित म्हणून नियुक्त असतील. तसेच नियोजन प्रक्रियेत ते प्रत्यक्षपणे सहभागी होऊ शकतील, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
वादाच्या सर्वच मुद्यांवर अभ्यासाची गरज
सरकार दरबारी अनेक तक्रारी आल्या आहेत. न्यायालयातही खटले पडून आहेत. खाजन शेती बुझवली जात आहे. खारफुटीची कत्तल होत आहे. डोंगरफोड करून करून उतारावर इमारती बांधल्या जात आहेत. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी यावर नव्याने विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक वादाच्या मुद्दय़ावर अभ्यास होणे आवश्यक आहे. सगळी प्रकरणे नव्याने विचारात घेऊन त्यावर योग्य निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करावी लागणार आहे.
अभ्यास समिती स्थापन
ओडीपी नव्याने तयार करण्यासाठी मुख्य नगर नियोजक राजेश नाईक, वरिष्ठ नगर नियोजक उत्तर व दक्षिण गोवा अवेज अजीज शेख, अमित सुखटणकर, आकाश खंवटे, गजानन करकरे, जयराधा पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कळंगूट, कांदोळी, हडफडे, नागोवा व पर्रा तसेच वास्को द गामा, पणजी, कदंबा प्लेटो, म्हापसा, मडगाव व फोंडा ओडीपीतील प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास करून अहवाल सादर करणार आहे. सरकारचे नगर नियोजन सचिव पुनित गोयल या समितीचे प्रमुख असतील, अशी माहिती त्यांनी दिली.
पर्रा, नागोवा परिसरात मोडले सर्वाधिक नियम
पर्रा नगोवा येथे रस्ते नसताना ओडीपीवर भले मोठे रस्ते दाखवून मोठय़ा इमारतींना परवाने दिले गेले आहेत. या गावातील गावपणच हरवले आहे. ते यापुढे सुरक्षित राखण्यासाठी बाहय़ विकास आराखडय़ात बदल हवा. वाहने चालविण्यासाठी रस्तेच नाहीत. रस्त्यासाठी नियोजन हवे. कळंगूट, कांदोळी भागातही तीच परिस्थिती असून यापूर्वी नियोजन नसताना विकास करण्यात आल्याचा आरोप मंत्री राणे यांनी केला.
नवा आराखडा तयार करण्यासाठी साठ दिवस
बाहय़ विकास आराखडा रद्द झाला असून त्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी 60 दिवसांची मुदत दिली आहे. यापूर्वी झालेल्या सर्व भूरुपांतराचा अभ्यास होणार आहे. त्यानंतर नव्या बाहय़ विकास आराखाडय़ाचा मसुदा जनतेसमोर उघड करून हरकती घेतल्या जातील. नंतरच या आराखडय़ाला अंतिम स्वरुप दिले जाईल. यापुढे गोव्याचा विकास नियोजनबद्ध पद्धतीनेच होणार असल्याची माहिती राणे यांनी दिली.