लंडन उच्च न्यायालयात दावा ः मानसोपचार तज्ञांनी दिली माहिती
लंडन / वृत्तसंस्था
पीएनबी घोटाळय़ात ‘वॉन्टेड’ असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी भारतात येण्यास घाबरत आहे. भारतात प्रत्यार्पण केल्यास मला एकतर मारले जाईल किंवा माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल, असे लंडनच्या तुरुंगात कैद असलेल्या नीरवच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले. यापूर्वीही त्याने भारतात गेल्यास मला तुरुंगातच मरावे लागेल असे म्हटले होते.
नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेची 14,500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. फेब्रुवारीमध्ये ब्रिटनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयाने मोदीच्या भारतात प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. या निर्णयाविरोधात त्यांनी लंडन उच्च न्यायालयात अपील केले. भारतात आणल्यानंतर त्याला मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील बॅरॅक क्रमांक 12 मध्ये ठेवण्यात येणार आहे. आर्थर रोड जेल प्रशासनाने बॅरॅक 12 मधून सर्व तीक्ष्ण आणि धोकादायक वस्तू काढून टाकल्याचे सांगितले आहे. पण कैद्यांनी दाराच्या हँडलला आणि नळांना लटकून जीव दिल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे धोका तपासून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
नीरव मोदी मध्यम डिप्रेशनने ग्रासलेला आहे. कुटुंबापासून दूर राहिल्याने हा प्रकार घडला असून नीरवच्या आईनेही आत्महत्या केल्याचे नीरवचे मानसोपचारतज्ञ प्रोफेसर अँड्रर्य़ू फॉरेस्टर यांनी उच्च न्यायालयाला सांगितले. भारत सरकारच्या कारागृहातील परिस्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. भारतात कैद्यांच्या वैयक्तिक काळजीसाठी कोणतीही योजना नाही. तसेच भारतीय तुरुंगात आत्महत्या रोखण्यासाठी कोणताही प्रोटोकॉल नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
भारतात दररोज वकिलाला भेटण्याची सूट
नीरव मोदी कैदेत असताना आपल्या वैयक्तिक मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेऊ शकेल. तसेच त्याच्यासोबत कोठडीत आणखी एक कैदी असेल. याव्यतिरिक्त नीरव आपल्या वकिलाला रोज भेटू शकतो. त्याचवेळी, आठवडय़ातून एकदा आपल्या कुटुंबास भेटण्यास हरकत नसेल, असे भारत सरकारतर्फे वकील हेलन माल्कम केसी यांनी न्यायालयाला सांगितले.