सध्या रोज वेगवेगळे वातावरण आपण अनुभवतोय, थंडी, उन, वारा, धुकं पण या सगळय़ात आकाश मात्र पुन्हा निरभ्र, जणु काही घडलंच नाही असा चेहरा घेऊन बसलेले…..एखाद्या खोडकर मुलासारखी सूर्यकिरणं या सगळय़ात पुन्हा बागडत असतात. पावसात न अडकणारं, इंद्रधनुष्यासाठी हट्ट न करणारं, असं हे आकाश निर्लेपाचे अलिप्तपण जपणारं. वसंत ऋतु आणि पानगळ सारख्याच नजरेनं पहाणारे आभाळ होता आलं पाहिजे. पावसामुळे किती पडझड झाली अन निसर्गात कोणाला बहर आले हे थांबून न राहता आपापलं कर्म करत पुढे जाणाऱया स्थितप्रज्ञासारखे निर्लेप होता आले पाहिजे. ‘रंगात या रंगून साऱया रंग माझा वेगळा’ सांभाळता आला पाहिजे.
गौतम बुद्धांना हे शक्मय झाले होते. दिव्यज्ञान प्राप्त झाल्यावर भिक्षा मागतांना स्वतःच्याच वैभवशाली राजवाडय़ासमोर एखाद्या उत्तुंग पहाडासारखे उभे होते. भिक्षा घालायला आलेली पत्नी यशोधरा आणि पुत्र रडत आपली कथा सांगत होते पण मुळातच यौगिक अवस्थेला प्राप्त झाल्याने शांतपणे भिक्षा घेऊन मागे वळले, त्यांची पावलं ज्या ज्या ठिकाणी उमटली तिथे सुंदर कमळं उमलली होती त्याचं या जगण्यातलं अलिप्तपण दाखवत होती.
हे सगळेच विचार मनात असताना एका मैत्रीणीच्या घरी गेले. अतिशय श्रीमंत थाट, राजवाडय़ासारखं घर, प्रचंड भांडी आणि ऐश्वर्य दाखवणाऱया वस्तू याचं प्रदर्शनच. पण मला घरात गेल्या गेल्या सगळेच बदल जाणवले, नवीन सून घरात आली होती त्यामुळे असेल असं वाटून आम्ही बोलत बोलत थेट स्वयंपाकघरात गेलो. तिथे जुनी तांब्या पितळीची भांडी जाऊन टप्परवेअरची भांडी, निर्लेपचे तवे, ऐटीत बसलेली. हा सगळा बदल पचवणारी आणि हसतमुखाने वावरणारी मैत्रीण मला त्या निरभ्र आकाशासारखी वाटली. नुकत्याच एका दुसऱया मैत्रीणीच्या सासूबाई गेल्या म्हणून भेटायला गेल्यावर ती सांगत होती मैत्रीणीच्या लग्नात रूखवतात चांदीची भांडी मांडली नाही हा राग मनात ठेवूनच गेल्या त्या. अशा संसारात मुलाबाळात अडकलेल्या हजारो लोकांना आपण बघत असतो पण अलिप्तपण काही केल्या येतच नाही निर्लेप भांडय़ात गोड करा, तिखट करा, काहीही करा त्याला काही चिकटून रहात नाही. कशाचं सुखदुःख नाही की कशाचं सोयर सुतक नाही.
‘आपणासी निरखावे आपण त्रयस्थपणे’ आणि मग लक्षात येईल….की आपण या लेपांमुळे …..कधी मोकळेपणाने खळखळून हसलोच नाही, ढसढसा रडलोच नाही, कुणाजवळ मन मोकळच केलं नाही…..सतत याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, समाज काय म्हणेल, यांच्यातच जगत आलो…..तो दगडाचा देव आवरण टाकू शकतो तर मी का नाही. प्रयत्न करायला सुरूवात करू या. अशक्मय मुळीच नाही. नातवंडावर प्रेम असलं तरी आता संसार मुलाचा आहे त्याला त्याचे निर्णय घेवू द्या, आपलं वय वाढलय याची जाणीव स्वतःला करून द्या. आपली उदाहरणं त्यावेळच्या परिस्थितीनुसार होती याचं भान ठेवा. ज्याचं त्याचं आभाळ ज्यानं त्यानं पेलायचं असतं. पाठीवरची, मनावरची ओझी किती ठेवायची आणि किती उतरवायची यातच प्रत्येकाचं अलिप्तपण असतं. तेच आपल्याला या निर्लेपाच्या वाटेवर घेउन जातं हे नक्कीच…..