ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंना संपवण्याची सुपारी उद्धव ठाकरे यांनी दिली होती, असा खळबळजनक आरोप भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे.
नितेश राणे यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंना संपवण्याची सुपारी उद्धव ठाकरे यांनी दिली होती. सध्या राज्यात उद्धव ठाकरे यांच्याबाबत वेगळी प्रतिमा घडवली जात आहे. ते आजारी आहेत, ते सोज्वळ आहेत, असं दाखवलं जात आहे. पण ते जर दुसऱ्याच्या जीवावर उठत असतील, दुसऱ्याला मारण्यासाठी सुपाऱ्या देत असतील तर असा माणूस स्वच्छ मनाचा नाही. आता आदित्य ठाकरे यांचा राज्याचा दौरा संपू द्या, त्यानंतर आम्ही व्याजासकट वस्त्रहरण सुरु करू असा, इशाराही नितेश राणेंनी दिला आहे.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांना ज्यावेळी धमक्या येत होत्या, त्यावेळी राणेसाहेबांसारख्या शिवसैनिकांनी जीवाची पर्वा न करता तासनतास मातोश्रीबाहेर थांबून संरक्षण दिलं आहे. त्याच व्यक्तिला मारायच्या सुपाऱ्या बाळासाहेबांच्या सुपुत्रांकडून दिल्या जात आहेत. उद्धव ठाकरे नेमके कसे आहेत, हे महाराष्ट्रातील जनेतला समजायला हवं. योग्य वेळी सगळी माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणली जाईल, असेही राणेंनी यावेळी सांगितले.