ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Prime Minister) यांच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठक पार पडली. राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाची ही बैठक पार पडली. जुलै २०१९ नंतर गर्व्हनिंग काऊंसिलची ही पहिली व्यक्तिगत बैठक आहे. या बैठकीत सर्व राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले आहेत. मात्र तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish kumar) यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.
दरम्यान, या बैठकीला गैरहजर राहण्यापूर्वी केसीआर यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. केंद्र सरकारकडून तेलंगणासह इतर राज्यांमध्ये भेदभाव केला जात आहे, याचा निषेध म्हणून आपण या बैठकीला गैरहजर राहणार असल्याचं केसीआर यांनी सांगितलं आहे. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे नुकतेच कोविड-१९ संसर्गातून बरे झाले आहेत. त्यामुळे ते या बैठकीला गैरहजर राहिले आहेत. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाला गैरहजर राहण्याची नितीश कुमार यांची ही एका महिन्यातील दुसरी वेळ आहे.
जुलै २०१९ नंतर गव्हर्निंग काउन्सिलची पहिल्यांदाच ऑफलाइन बैठक पार पडत आहे. या बैठकीला नीति आयोगाचे वरिष्ठ शिष्ठमंडळ, सर्व मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
दरम्यान, NITI आयोग गव्हर्निंग कौन्सिलची बैठक दरवर्षी होते. गेल्या वर्षी, २० फेब्रुवारी २०२१ रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पश्चिम बंगाल, पंजाब, तेलंगणा आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीला हजेरी लावली नव्हती. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री विजय रुपाणी प्रकृतीच्या कारणास्तव बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.