पुढील सुनावणी 18 सप्टेंबर रोजी
खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीने खानापूर येथे 2006 साली सीमाप्रश्नासंदर्भात मेळावा घेतला होता. यावेळी महाराष्ट्रातील नेतेही मेळाव्याला उपस्थित होते. मेळाव्यात रामदास कदम आणि नितीन बानुगडे पाटील यांनी कर्नाटक शासनावर भाषणातून हल्लाबोल केला होता. त्यामुळे प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याची सुनावणी खानापूर न्यायालयात सुरू आहे. याची सुनावणी सोमवार दि. 12 रोजी खानापूर न्यायालयात होती. यासाठी माजी मंत्री रामदास कदम आणि उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील खानापूर न्यायालयात आपल्या वकिलासह हजर झाले होते. या खटल्याची पुढील सुनावणी 18 सप्टेंबर रोजी होणार आहे. यावेळी वकील शामसुंदर पत्तार व हेमराज बेंचन्नावर यांनी काम पाहिले. आजच्या सुनावणीप्रसंगी श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष समिती नेते रमाकांत कोंडुसकर, यशवंत बिर्जे, मुरलीधर पाटील या नेत्यांसह खानापूर म. ए. समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष आय. आर. घाडी यांनी नितीन बानुगडे पाटील आणि रामदास कदम यांचे खानापूर वकील संघटनेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.