ऑनलाईन टीम / सोलापूर :
सोलापूर जिल्हा एकेकाळी दृष्काळी भाग होता. मात्र, आता यंदा तिथे 22 लाख टन ऊसाचं गाळप झालं. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात लागवड होत राहिली तर एक दिवस ऊस उत्पादकांना आत्महत्या करण्याची वेळ येईल, असा इशारा देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी वाढत्या ऊस उत्पादनावर चिंता व्यक्त केली आहे.
गडकरी म्हणाले, भारतात साखरेचं उत्पादन सरप्लस आहे. माझ्याकडे काही दिवसांपूर्वी ब्राझिलचे शिष्टमंडळ आलं होतं. तिथं आता दृष्काळ आहे. म्हणून आमदार बबनदादा शिंदे यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. पण तिथे साखरेचं उत्पादन झालं तर साखरेचा दर 22 रुपयांवर येईल. परिणामी तुमच्या उसाला काहीच भाव राहणार नाही. यंदा सोलापूर जिल्ह्यात 22 लाख टन ऊसाचं गाळप झालं. इतक्या मोठय़ा प्रमाणात उसाची लागवड होत राहिली तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ येईल, माझा शब्द लिहून ठेवा.
साखर सरप्लस असल्याने घाटय़ात जाणार आहे. दुसरीकडे ऊसाचा दर कमी करता येणार नाही, कारण तुम्हाला राजकारण करायचं आहे. त्यामुळे ऊसाचा भाव तेवढाच द्यावा लागेल, मग काय स्थिती होईल ते बघा. कारखानदारी नुकसानीमध्ये जाणारी आहे. त्यामुळे बगॅसपासून हायड्रोजन निर्मिती करा. उसाच्या सायपरपासून इथेनॉल निर्मिती करा. पेट्रोलला हद्दपार करा, असेही गडकरी म्हणाले.