जीतनराम मांझी यांचा मोठा दावा
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहार विधानसभेत गुरुवारी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि हिंदुस्थान अवाम मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी यांच्यात वाक्युद्ध झाले होते. यादरमयान नितीश कुमार हे स्वत:वरील संयम गमावून बसले होते आणि मांझी यांना उद्देशून आक्षेपार्ह उद्गार काढले होते. आता मांझी यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री नितीश यांच्यावरून केलेल्या दाव्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांची मागील तीन लक्षणे पाहता त्यांची मानसिक स्थिती योग्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांना विषयुक्त भोजन दिले जात आहे. सर्वप्रथम नितीश कुमार यांनी अशोक चौधरी यांचे वडिल महावीर चौधरी यांच्याबाबत गोंधळ केला. त्यानंतर महिलांविषयी केलेली अश्लील टिप्पणी तर कळसच करणारी होती. त्यानंतर गुरुवारी त्यांनी ज्याप्रकारे माझा अपमान केला ते पाहता नितीश कुमार यांच्यावर कुठे ना कुठे विषप्रयोग होत असल्याचे सिद्ध होते असे मांझी यांनी म्हटले आहे.
विधानसभा अध्यक्ष हे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने स्वत:चे सर्व निर्णय देत आहेत. हा प्रकार घटना आणि लोकशाहीसाठी घातक आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे दोषी आहेत, परंतु विधानसभा अध्यक्ष देखील त्यांच्यापेक्षा कमी दोषी नाहीत असे मांझी यांनी म्हटले आहे.
आंदोलनाची घोषणा
नितीश कुमारांकडून अपमान करण्यात आल्यावर जीतनराम मांझी यांनी रस्त्यापासून सभागृहापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. प्रथम मी राज्यपालांची भेट घेणार आहे. यानंतर राष्ट्रपतींनाही भेटणार असल्याचे मांझी यांनी सांगितले आहे. तर नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे जोपर्यंत राजीनामा देत नाही तोवर आंदोलन सुरू राहणार असल्याचे भाजप नेते विजय सिन्हा यांनी म्हटले आहे.