राजद नेते सुधाकर सिंह यांचे टीकास्त्र
वृत्तसंस्था /पाटणा
बिहारच्या महाआघाडी सरकारमध्ये मंत्री असताना राजद नेते सुधाकर सिंह यांनी थेट मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य केले होते. कृषिमंत्री असताना सुधाकर यांनी नितीश कुमार यांच्या कृषी धोरणांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यामुळे सुधाकर यांना मंत्रिपद गमवावे लागले होते. सुधाकर यांनी पुन्हा एकदा नितीश कुमार यांना लक्ष्य करत त्यांना ‘हुकुमशहा’ संबोधिले आहे. नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्र्याची स्थिती ‘शिपाया’सारखी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्याचे मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या नजरेत शिपाईसारखे आहेत. ते केवळ रबर स्टँप असून मंत्रिपद नाममात्र आहे. सगळे निर्णय मुख्यमंत्री नितीश कुमार हेच घेत असतात. मुख्य सचिव फाइल आणतात आणि मंत्री निमूटपणे त्यावर स्वाक्षरी करत असल्याचा दावा सुधाकर सिंह यांनी केला आहे.
काही लोक पंतप्रधान होण्यासाठी व्याकुळ झाले आहेत. जणू स्वर्गात जाण्याचा मार्ग थेट पंतप्रधानपदाच्या खुर्चीवरून जात असल्याचे त्यांचे वागणे आहे. पंतप्रधान झाल्यावरच अशा लोकांचा आत्मा संतुष्ट होईल असे म्हणत सुधाकर यांनी नितीश कुमार यांच्यावर बोचरी टीका केली आहे.