ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भाजपासोबत युती करून बिहारचे सरकार चालवणारे नितीश कुमार यांचे भाजपसोबत बिनसले आहे. भाजपसोबतच्या नाराजीमुळे मागील काही दिवसांपासून नितीश कुमार आपल्या जनता दल युनायटेडच्या आमदारांसोबत सातत्याने बैठका घेत होते. आता त्यांनी पक्षाच्या नेत्यांना आणि आमदारांना पुढील 72 तास पटना सोडून जाऊ नका, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे बिहारमध्ये कोणत्याही क्षणी राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.
नितीश कुमार यांनी भाजपासोबत हातमिळवणी करत आपली सत्ता राखली होती. परंतू नितीशकुमारांना त्याचा मोठा फटका बसला. त्यांच्या पक्षाच्या जागा कमी झाल्या. भाजपाने नितीशकुमारांना मुख्यमंत्रीपद सोडत आपल्या पदरात इतर महत्वाची खाती पाडून घेतली होती. त्यानंतर नितीश कुमार यांचे भाजपसोबत बिनसले. त्यामुळे भाजपाची साथ सोडून नितीश कुमार पुन्हा लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत सत्ता स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे. यासाठी नितीश कुमार यांनी दोन दिवसांपूर्वीच मंत्री, आमदार, खासदार, नेते यांच्यासोबत बैठका केल्या आहेत.
नितीशकुमार राजदच्यावतीने आयोजित इफ्तार पार्टीला गेले होते. तर तेजस्वी यादव हे नितीश कुमार यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला आले होते. तिथेच दोघांमधील दुरावा कमी झाल्याचे सांगण्यात येते. यापूर्वीही नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली होती. त्यामुळे बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ अटळ असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.