बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी : राज्यव्यापी दौऱ्याचीही घोषणा
वृत्तसंस्था /पाटणा
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. गुऊवार, 16 नोव्हेंबर रोजी पाटणा येथे आयोजित उद्योग विभागाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. केंद्रावर निशाणा साधत त्यांनी आता प्रत्येक ठिकाणी मोहीम राबवण्याची घोषणा केली. बिहारची उन्नती करायची असेल तर राज्याला विशेष दर्जा द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच हा दर्जा न दिल्यास केंद्र सरकारला बिहारची उन्नती करायची नसून फक्त दिखाऊपणा करायचा आहे, असा अपप्रचार करण्याचा इशारा त्यांनी दिला.
नितीशकुमार पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसायला लागले आहेत. कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केंद्र सरकार योजनांना कमी रक्कम देत असल्याचा आरोप केला. केंद्राच्या योजनांचा योग्य लाभ राज्यांना दिला जात नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपण पुन्हा राज्यव्यापी दौरा करत असल्याची घोषणाही त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरू शकतो. राज्यव्यापी दौऱ्यामागील आपले उद्दिष्टही नितीशकुमार यांनी निर्धारित केले आहे. राज्य सरकार जनतेच्या हितार्थ करत असलेल्या प्रत्येक कामाचा तपशील आम्ही प्रत्येक गावात पाठवू. आम्ही आजच अधिकाऱ्यांना सांगितले आहे. आमचे अधिकारी प्रत्येक ठिकाणी जाऊन विचारतील की काम झाले की नाही? काम झाले आहे, फायदा झाला की नाही?, काही अडचण असल्यास सांगा, अधिकारी दखल घेतील आणि लाभ देण्याचा प्रयत्न करतील. हे आमचे उद्दिष्ट असल्याचे नितीशकुमार म्हणाले.