बिहारमध्ये 160 आमदारांचा सरकारला पाठिंबा, भाजपचा सभात्याग
पाटणा / वृत्तसंस्था
बिहारमधील राजकीय उलथापालथीनंतर नितीश-तेजस्वी सरकारने बुधवारी विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जनता दल युनायटेडचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करताच भाजपा आमदारांनी सभात्याग केला. विरोधकांच्या वॉकआऊटनंतरही सत्ताधाऱयांनी मतदानाची मागणी केली. या मतदानात सत्ताधारी पक्षाला 160 आमदारांची मते मिळाली. ओवेसींचा पक्ष एआयएमआयएमनेही सरकारला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, विश्वासदर्शक ठरावापूर्वी भाजपा नेते विजय सिन्हा यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सत्ताधारी आमदारांनी विजयकुमार सिन्हा यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता.
9-10 ऑगस्ट रोजी भाजपासोबत युती तोडल्यानंतर नितीशकुमार यांनी काँग्रेस, डावे पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलासोबत महागठबंधन सरकार स्थापन केले होते. त्यानुसार बुधवारी विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव संमत करण्यासाठी विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनादरम्यान विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. माजी उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी मुख्यमंत्री नितीश यांची खिल्ली उडवली. नितीशकुमार यांनी आतापर्यंत अनेक नेत्यांची फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी माझ्यासोबत 7 पक्ष आहेत. आठव्या पक्षानेही पाठिंबा दिला आहे. फक्त तुम्ही म्हणजे भाजप विरोधात असल्याचे नितीशकुमार म्हणाले. यावर भाजप आमदारांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. त्यानंतर नितीशकुमार यांनी भाजप सदस्य सभागृहातून पळून गेल्याचा टोमणा मारला.
तेजस्वी यादव यांचाही विरोधकांवर हल्लाबोल
विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभाग हे सरकारचे तीन जावाई आहेत. जे भाजपाला शरण जात नाहीत, त्यांच्यावर या जावायांकडून दबाव आणला जातो’’, असा आरोप यादव यांनी केला आहे. दरम्यान, बहुमत चाचणीआधी राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित नोकरी घोटाळय़ाप्रकरणी सीबीआयने नेत्यांच्या घरावर छापेमारी केली आहे.
शुक्रवारी नवीन सभापती निवड
विशेष अधिवेशनादरम्यान सभापती विजय सिन्हा यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसभापती महेश्वर हजारी सभागृहाचे कामकाज पाहिले. बुधवारी सभागृहाचे कामकाज सुरू होताच सभापती विजय सिन्हा यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. माझ्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणे योग्य नाही, असे ते म्हणाले. ते नियमानुसार नाही. तरीही मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असे स्पष्टीकरण देताना त्यांनी जवळपास 20 मिनिटे सभागृहाला संबोधित केले. आता नवीन सभापती निवडीसाठी गुरुवार, 25 ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. शुक्रवार, 26 ऑगस्टला नवीन सभापतींची निवड होणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सभागृहाच्या विशेष अधिवेशनाची मुदत आणखी एक दिवसाने वाढवण्यात आली आहे. सुरुवातीला सभागृहाचे विशेष अधिवेशन दोन दिवसांसाठी आमंत्रित करण्यात आले होते.