ब्रिटीशांच्या जबर मारहाणीत आले हौतात्म्य
संग्राम काटकर कोल्हापूर
ब्रिटीश राजवट उलटून टाकण्यासाठी कोल्हापुरातील क्रांतिकारांनी वज्रमुठ बांधून हौतात्म्य पत्करण्याची तयारी ठेवली. कोल्हापूरच्या शिवाजी पेठेतील निवृत्ती गोविंद आडुरकर हे त्यापैकीच एक क्रांतीकारक. तुरुंगात ब्रिटीशांनी केलेल्या अमानुष मारहाणीत ते हुतात्मा झाले. त्यांचे हौतात्म्य सर्वांच्या स्मरणात रहावे, यासाठी शिवाजी पेठेतील पूर्वीच्या टांग्याच्या अड्डयाला (सध्याचा अर्धशिवाजी पुतळा) निवृत्ती चौक असे नाव दिले.
1942 साली महात्मा गांधींनी जुलमी ब्रिटीश सत्तेला ‘चले जाव’च्या दिलेल्या नाऱयाची वार्ता कोल्हापूरातही आली होती. त्यामुळे ब्रिटीशांना हुसकावण्यासाठी एकएक क्रांतीकारी तयार झाला. याचवेळी स्वातंत्र्यलढय़ाची माहिती सर्वदुर जावी म्हणून भाई माधवराव बागल निवेदने छापत होते. ही निवेदने कोल्हापूर, पन्हाळ्यातील जनमाणसांपर्यंत पोहोचण्याचे काम शिवाजी पेठेतील निवृत्ती आडूरकर हे भूमिगत राहून करत होते.
लढय़ाची दिशा ठरवण्यासाठी शिवाजी पेठेतील सरदार तालीम व ब्रम्हेश्वर मंदिरात बैठकाही घेत होते. एकेदिवशी सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारलेल्या माजी ब्रिटीश गर्व्हनर विल्सनच्या पुतळ्याला विद्रुप करण्याचे कामही निवृत्ती आडूरकर व गजानन भूसारी यांनी हाती घेतले. ऍसिडयुक्त डांबर भरलेली 14 मडकी विल्सनच्या पुतळा परिसरात नेऊन ठेवली. चौकाची स्वच्छता करण्याच्या निमित्ताने भागिरथी तांबट व जयाबाई हविरे यांनी मडक्यातील डांबर पुतळ्यावर ओतून ब्रिटीश राजवटीला सडेतोड इशारा दिला. पुतळा विद्रुपीकरणाचे काम पत्ते झाल्यानंतरही इंग्रजांची माहिती बागल यांना देण्यापासून ते स्वातंत्र्य लढयाची निवेदने पहाटे वाटण्याचे काम सुरुच ठेवले. पन्हाळगडावर निवेदन वाटताना इंग्रजांच्या छावण्या, अधिकाऱयांच्या बंगल्यांचा शोध घेतला. साथीदारांसोबत छावण्या, बंगले पेटवतेवेळी मात्र पोलिसांनी पकडून तुरूंगात टाकले. काही दिवसांची शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर ते पुन्हा सक्रीय झाले.
स्वातंत्र्यशाहीर दत्तोबा तांबट यांच्यासोबत बार्शी रेल्वे लाईट लुटण्यात आडूरकर सहभागी होते. जेजूरीच्या खंडोबाचे दागिने व खजिना ब्रिटीशांच्या हाती लागू नये म्हणून क्रांतीकारकांनी खजिनाच लुटला. त्यातही आडूरकर सक्रीय होते. पुढील काळात शिवाजी पेठेत भाई माधवराव बागल यांनी प्रजापरिषद सभा आयोजित केल्या. त्यातून दंगल माजू नये म्हणून आडूरकर व त्यांच्या साथीदारांकडे सभेची जबाबदारी सोपवली होती. मात्र इंग्रजांनी कपटीवृत्तीने आडूरकरांना दंगल माजविण्याच्या गुह्याखाली अटक करून नऊ महिने सक्तमजुरी व 50 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. कच्च्या तुरूंगातील गैरसोय बघून त्यांनी 11 दिवस उपोषण केले. याचवेळी इंग्रजांनी त्यांच्या जिभेसह शरीरावर दाबणे टोचून त्यांना रक्तबंबाळ केले. पत्री सरकार असल्यामुळे त्यांच्या पायामध्ये मारलेल्या पत्रीच्या वेदना सहन न झाल्याने ते बेशुद्ध पडले. तुरुंगात त्यांचे निधन झाल्यास जनक्षोभ उसळेल या भीतीपोटी अधिकाऱयांनी आडूरकारांना रात्रीच्या सुमारास शासकीय रूग्णालयात दाखल केले. दुसऱयाच दिवशी कुटुंबीयांनी रूग्णालयातून आडुरकरांना घरी आणले तरीही जखमी अवस्थेत ते स्वातंत्र्यलढाचीच भाषा बोलत होते. 9 ऑगस्ट 1943 रोजी ते बैठकही घेणार होते. पण याचदिवशी त्यांचे निधन झाले. अंत्ययात्रा टांग्याच्या अडय़ात आली तेव्हा बागल यांनी अड्डयाचे हुतात्मा निवृत्ती आडूरकर चौक असे नामकरण केले. तेव्हापासून हा चौक कोल्हापुरी इतिहास निवृत्ती चौक म्हणून नावारुपाला आला.
निवृत्ती आडूरकर यांचे मूळगाव आडूर (ता. करवीर). त्यांच्या आईचे नाव विठाबाई व वडीलांचे नाव गोविंद दुलभाजी आडूरकर. सुतारकामासाठी आडूरकर दांपत्य कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथे आले. त्यांना निवृत्ती, भागवत, जनाबाई व अक्कुबाई ही चार मुले होती. 1917 ला निवृत्ती यांचा जन्म झाला. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे त्यांना चौथीपर्यंतच शिक्षण घेता आले. पण त्यांनी दिलेले बलिदान कोल्हापूरच नव्हे तर साऱया महाराष्ट्रासाठी प्रेदणादायी ठरले आहे.
सूनबाई भारती यांनी माहिती जपून ठेवली…
निवृत्ती आडूरकर यांचे कुटुंबीय आजही सुतारकाम करत उदरनिर्वाह करत आहे. निवृत्ती यांचे सख्खे भाऊ (कै.) भागवत यांच्या सूनबाई भारती नरेंद्र आडूरकर यांनी 92 वर्षीय सासूबाई आनंदी व भागवत यांनी निवृत्ती आडूरकरांच्या हौतात्म्याची दिलेली माहिती अंक मुल्य ठेवा म्हणून जपून ठेवली आहे.