ऑनलाईन टीम/तरुण भारत
Ankita Bhandari Case : गेल्या पाच दिवसांसून बेपत्ता असलेल्या उत्तराखंडमधील अंकिता भंडारी हत्याकांड प्रकरणातील (Ankita Bhandari Case) गुंतागुंत वाढत चालली आहे. अंकिता भंडारी या तरुणीची नदी फेकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, अंकिता भंडारीचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, तिचा मृत्यू हा गुदमरणे आणि पाण्यात बुडाल्यामुळे झाला असल्याचे सांगण्यात आले आहे
अंकिता भंडारीचा मृत्यू हा गुदमरणे आणि पाण्यात बुडाल्यामुळे झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याशिवाय, शरीरावर जखमांचे व्रणही आढळून आले आहेत. या जखमांबाबतचा खुलासा पूर्ण अहवालात स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर अंकिताचे कुटुंबीय आक्रमक झाले आहेत. त्यांनी तिच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कार थांबवले आहेत.
अंकिता भंडारीच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार होते. शवविच्छेदन अहवालानंतर ते रोखण्यात आले आहेत. प्रशासनाकडून भंडारी कुटुंबीयांची समजूत घालण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. तर, अंकिताच्या कुटुंबीयांनी सरकारच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. अंकिताच्या हत्येचे पुरावे नष्ट करण्यासाठी रिसॉर्ट तोडण्यात आले असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
हे ही वाचा : ‘भाजपला आव्हान देण्यासाठी’ आयएनएलडीच्या रॅलीत विरोधी नेते एकत्र
दरम्यान, अंकिताचा शनिवारी सकाळी मृतदेह सापडला. याप्रकरणी पोलिसांनी मृतदेहावर पोस्टमार्टम केलं आहे. परंतु, अंकिताच्या भावाने पुन्हा एकदा पोस्टमार्टम करण्याची मागणी केली आहे. अन्यथा मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा इशारा दिला. पोस्टमार्टममध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.
पुन्हा पोस्टमार्टम करण्याची मागणी अंकिताच्या भावाने केली आहे. अंतिम अहवाल आल्याशिवाय अंकितावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा इशारा तिच्या भावाने दिला. तसंच, अंकिताच्या हत्येची माहिती मिळताच प्रशासनाने तत्काळ ती हॉटेलच्या ज्या खोलीत राहिली ती खोली तोडली. त्या खोलीत पुरावे असू शकतात. ते पुरावे लपवण्यासाठी खोली तोडली असल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे अंकिताच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल येत नाही, तोवर अंत्यसंस्कार होणार नाहीत. दरम्यान, याप्रकरणी विकासखंड पौडीच्या ग्राम पंचायतीतील लोकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.