अध्याय एकविसावा
भगवंतांनी वेदार्थाचे सविस्तर निरूपण केल्यावर उद्धवाला आता भगवंत या विषयावर बोलायचे थांबणार आणि आपण भगवंतांच्या अमृतबोलाला मुकणार असे वाटून तो थोडासा नाराज झाला. त्याची नाराजी पाहून भगवंत म्हणाले, मोठमोठय़ा ऋषीमुनींनाही न उमगलेला, वेदाचा समग्र अर्थ मी तुला सांगितला आहेच पण अजून तुझी तृप्ती झालेली दिसत नाही. तू मला अत्यंत प्रिय आहेस म्हणून तुझं समाधान करण्यासाठी मी वेदांचा सारांश तुला सांगतो. ते ऐकून तुला आनंद होईल. ऐक, ‘अद्वैतरूप ब्रह्म एक आहे’ या श्रुतिवाक्मयानेच द्वैत मिथ्या होऊन जाते. द्वैत मिथ्या झाल्यावर वेदाचे अस्तित्व संपते आणि त्यासह वेदाचे कार्यही संपते.
ब्रह्म हे पूर्णपणाने सदोदित असते तसेच असते. निर्विकार शुद्ध ब्रह्मात ‘मी ब्रह्म’ अशी स्फूर्ती स्फुरण पावते, तेथेच ओंकाराची उत्पत्ती होते. तो ओंकारही ब्रह्मरूपच आहे. त्याला ‘एकाक्षर ब्रह्म’ असे म्हणतात. त्या ओंकारापासूनच स्वरवर्ण उत्पन्न होऊन श्रुतीच्या मोठमोठय़ा शाखा उत्पन्न झाल्या. ते सारे ब्रह्मरूपच होय. याप्रमाणे सर्व वेद पूर्ण परब्रह्मरूप आहे ज्याप्रमाणे सोन्याचे दागिने पाहिले असता सारे सोनेच असते, त्याप्रमाणे श्रुतिशाखांनी झालेला जो वेदाचा विस्तार तोही सारा ओंकारस्वरूपाने मद्रूपच आहे.
‘वेदांनी प्रतिपादन केलेला पुरुषोत्तम, भक्तांच्या मनःकामना पूर्ण करण्याविषयी कल्पतरु आणि तिन्ही कांडांमधील संबंध पूर्वापर विरोध नसणाराच आहे. हाच अत्यंत शुद्ध वेदाचा अर्थ होय. तो मी तुला विशद करून सांगितला. उद्धवा ! याहून निराळा असा वेदाचा अर्थ मुळीच नाही. मी जो तुला आता अर्थ सांगितला तोच खरा होय. ह्या वेदाच्या अर्थातील निजखूण हृदयामध्ये ठेवली असता जीवा-शिवास समाधान होते. उद्धव हे ऐकून वेदाच्या अर्थामध्ये निमग्न झाला. त्याचे दोन्ही डोळे भरून आले व मन आत्मानंदामध्ये बुडून गेले. चित्त चैतन्यात लय पावले, गहिवराने गळा दाटून आला, स्वानंदाची गोडी लागताच रोमांची गुढी
उभारली.
शरीराला घाम सुटून ते थरथर कापू लागले. डोळय़ात आनंदाश्रु भरल्यामुळे शब्द फुटेनासा झाला. मूर्छा येऊ लागली, पण ती सावरून धरली. त्याला आठवण झाली की, हा गैरसावधपणा उपयोगी नाही. मी जर गाफील राहिलो तर तेवढय़ात श्रीकृष्ण निजधामालाही जातील व आपल्याला मिळणारा उपदेश राहून जाईल म्हणून त्याने डोळे उघडले. त्याबरोबर झगझगीत मेघासारखा श्यामसुंदर, मुकुट, कुंडले व मेखला धारण केलेली, कासेला सोनसळेचा कसलेला पीतांबर, पायांपर्यंत रुळत असलेली वनमाला, असा श्रीकृष्ण त्याला दिसला. तो हृदयात चैतन्यधन अनुभवीत होताच. डोळे उघडताच आनंदघन श्रीकृष्णाची मूर्ती तशीच्या तशीच समोर दिसू लागली. त्याच्या लक्षात आले की, श्रीकृष्ण चैतन्यघन असून, चैतन्याची केवळ मूर्तीच आहे. सगुण व निर्गुणरूपाने श्रीकृष्ण हा परिपूर्ण ब्रह्मस्वरूप आहे.
उद्धवाचे भाग्यच मोठे! कारण, सगुण आणि निर्गुण या दोन्ही स्वरूपांचे सुख तो एकटाच भोगत होता. हे केवळ श्रीकृष्णकृपेचे माहात्म्य होय. सद्गुरुंची जेव्हा परिपूर्ण कृपा होते, तेव्हा जीवाची आवड हीच प्रमाण असते. त्याने जर सगुण मूर्ती मागितली, तर गुरुही तीच देतात. निर्गुण स्वरूपाची प्राप्ती व्हावी, असे त्याच्या मनात असेल, तर गुरूची कृपा त्याला निर्गुणस्वरूपाच्या स्थितीत निश्चलपणे नांदविते किंवा सगुण व निर्गुण ह्या दोन्ही स्वरूपांचा उपभोग घ्यावयाची ज्याच्या मनात आवड असेल, तर त्याच्या त्या दोन्ही आवडी पुरविण्याविषयी कृपाळू गुरु समर्थ असतात. सद्गुरूचा महिमा अगाध आहे, तो वेदालासुद्धा सांगता येत नाही. त्यांची परिपूर्ण कृपा झाल्यानंतर कोणताच पदार्थ दुर्लभ नाही.
त्या श्रीकृष्णाच्या कृपेमुळे उद्धवाचे ते दुर्लभपण नाहीसे झाले आणि सगुण व निर्गुण दोन्ही कृष्णच आहे, ही खूण हृदयाला पुरती पटली. ही कृष्णाची परिपूर्णता जाणून, त्याच्या चरणकमळी लक्ष ठेवून उद्धवाने धावून जाऊन श्रीकृष्णचरणावर लोटांगण घातले.
क्रमशः