मेहबूबा मुफ्तींनी केंद्र सरकारला सुनावले ः काश्मीर मुद्दय़ावर तोडगा काढला जावा
वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्रातील भाजप सरकारला कठोर संदेश दिला आहे. काश्मीर प्रश्नावर तोडगा निघत नाही तोवर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये कितीही सैन्य तैनात केले तरीही स्थिती बदलणार नसल्याचा दावा मुफ्ती यांनी रविवारी केला आहे.
काश्मीर हे भारताशी राज्यघटनेद्वारे जोडले गेलेले आहे. परंतु भाजपने राज्यघटनाच धोक्यात आणली आहे. आम्ही काश्मीरला भाजपचा होऊ देणार नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.
सरकारने हल्लेखोरांप्रमाणे वर्तन करू नये, कारण हल्लेखोरांना हुसकावून लावण्यास काश्मिरी सक्षम आहेत. पाकिस्तानातून हल्लेखोर आले होते, तेव्हा भारतीय सैन्य येथे पोहोचू शकले नव्हते. तेव्हा येथील लोकांकडे बंदुका नव्हत्या, तरीही लोकांनी हल्लेखोरांना हुसकावून लावले होते. याचमुळे हल्लेखोर होऊ नका असे मुफ्ती यांनी इशारावजा शब्दांत सरकारला उद्देशून म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्यात आल्यावर स्थानिक स्वराज संस्था निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीवरून त्यांनी केंद्र सरकारला सुनावले आहे. काश्मीरने भारतासोबत राज्यघटनेचे नाते जोडले होते, हे नाते केंद्र सरकारने संपुष्टात आणले आहे. सरकारने आमच्या सन्मानाला धक्का पोहोचविला आहे. जम्मू-काश्मीरची विधानसभा अन् घटना संपुष्टात आणल्यावर सरकार जर स्थानिक निवडणूक करविल्याचे जागतिक समुदायाला सांगत असल्याचा आरोप मुफ्ती यांनी केला आहे.
महात्मा गांधी अन् माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या स्वप्नांतील भारताचा उल्लेख करताना मुफ्ती यांनी राहुल गांधी शोध घेत असलेल्या भारताबद्दल मी बोलत असल्याचा दावा केला आहे. कुठल्या देशासोबत काश्मीरचे विलीनीकरण केले आणि का अशी विचारणा काश्मिरी लोक करत आहेत. जेव्हा हिंदू अन् मुस्लीम धर्माच्या नावावर संघर्ष करत असताना बहुसंख्याक मुस्लीम समुदायाने काश्मिरी पंडित अन् हिंदू तसेच शिखांचा जीव वाचविला होता. महात्मा गांधी अन् नेहरू यांनी मिळून तयार केलेल्या भारताबद्दल मी बोलत नाही, आताच्या भारताबद्दल मी बोलत नसल्याचे उद्गार मुफ्ती यांनी काढले आहेत.