पुणे / प्रतिनिधी :
भाजपचे लक्ष्य असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री वा अन्य कुणीही आले, तरी त्याचा फरक थेट मतदानावर होणार नसल्याचा विश्वास माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी येथे व्यक्त केला. दरम्यान, राज्य सरकार हेच अल्पावधीसाठीच आहे. नियम डावलून सत्तेत बसलेले हे सरकार अधिक काळ टिकणार नसल्याचेही मुंडे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या घरी गणरायाच्या आरतीला ते आले होते. त्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंडे म्हणाले, ज्या विभागात गेल्या 20 ते 25 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रसने जनतेची सेवा केली आहे, त्या बालेकिल्ल्याला खिंडार पडणार नाही. बारामती, पुणे, पिंपरी-चिंचवड या ठिकाणी भाजपाच्या कित्येक पिढय़ा गेल्या, तरी त्यांना अपेक्षित बदल होणार नाही. कारण, या मतदारसंघात झालेली कामे बोलत आहेत. बारामती मतदारसंघामध्ये यापूर्वीच भाजपाचे डिपॉझिट जप्त झाले होते.
अधिक वाचा : विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यनगरी सज्ज, मानाच्या गणपतींची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक
शिंदे सरकार थोडय़ा दिवसांचेच..!
राज्यात शिंदे आणि फडवणीस सरकार हे विश्वासघाताने आलेले आहे. त्यामुळे हे सरकार अधिक काळाचे नाही. लवकरच याबाबत सुनावणी होईल. जनतेची दिशाभूल आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खूपसून हे सरकार सत्तेवर आले आहे. शिवाय हे सत्य जनतेपासून लपून राहिलेले नाही. त्यामुळे अवघ्या काही दिवसांमध्ये हे सरकार कोसळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.