वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांचे होत असलेले टार्गेट किलिंग आणि खोऱयातून विस्थापनावरून आम आदमी पक्षाने रविवारी दिल्लीतील जंतर-मंतरवर निदर्शने केली आहेत. पक्षाने यावेळी जनआक्रोश रॅलीचे आयोजन पेले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या रॅलीला संबोधित करत भाजपवर निशाणा साधला आहे. खोऱयात काश्मिरी पंडितांची हत्या होत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे केवळ बैठका घेत आहेत. काश्मीर मीटिंग नव्हे तर ऍक्शनची मागणी करत आहे. काश्मीरमधील सद्यस्थितीवर पूर्ण देश चिंतेत असल्याचे उद्गार केजरीवालांनी काढले आहेत.
केंद्र सरकारकडे सध्या काश्मीरसंबंधी कुठलीच योजना नाही. भाजपला काश्मीर सांभाळणे जमलेले नाही. भाजपला केवळ गलिच्छ राजकारण करणे जमते. मोठे धाडस करून काश्मिरी पंडित स्वतःची जन्मभूमी, मातृभूमीत परतले होते, परंतु पुन्हा त्यांना हतबल होत स्वतःचे घर सोडून जावे लागत आहे. श्रीनगर विमानतळावर काश्मिरी पंडितांच्या रांगा दिसून येत आहेत. खोऱयातून बाहेर पडण्यासाठी लोक प्रसंगी ट्रकमधून प्रवास करत असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
काश्मीर फाइल्सच्या नावावर नक्राश्रू
या रॅलीला आपचे खासदार संजय सिंह यांनीही संबोधित केले. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, सर्व केंद्रीय मंत्री आणि खासदार काश्मीर फाइल्सच्या नावावर नक्राश्रू ढाळत होते. काश्मिरी पंडितांची हत्या होत असताना केंद्राचे मंत्री, खासदार, आमदार कुठे लपून बसले आहेत असे आम्ही पंतप्रधान मोदींना विचारू इच्छितो. काश्मिरी पंडित स्वतःच्या सुरक्षेसाठी रस्त्यांवर उतरले असता सरकार त्यांना सुरक्षा देण्याऐवजी लाठीमार करते. काश्मिरी पंडितांना त्यांच्याच घरात कैद केले जात असल्याचे संजय सिंह यांनी म्हटले आहे.
1990 सारखी स्थिती
काश्मीरचा तरुणवर्ग शाळा, रुग्णालये मागत असताना भाजप सरकार त्यांच्यावर गोळय़ा झाडत आहे. भाजपने केवळ काश्मीरमधील स्थिती सुधारण्याचा प्रचार केला, परंतु प्रत्यक्षात काश्मीरला त्यांनी 1990 सारख्या स्थितीत लोटले असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे.