भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचे मत
प्रतिनिधी/ पणजी
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे भाजपचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीसाठीही तेच उमेदवार असतील. त्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीतील भाजपा उमेदवारीसंबंधी विषयावर पडदा पडला आहे.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी हल्लीच एका कार्यक्रमादरम्यान बोलताना उत्तर गोव्यातील लोकसभेची पुढील निवडणुकही आपण लढवणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून पत्रकारांनी विचारले असता श्री. तानावडे यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले.
लोकसभा उमेदवारीसाठी आपण कधीच इच्छा व्यक्त केलेली नाही. मी प्रदेश अध्यक्ष आहे आणि त्या पदाला न्याय देण्याचे प्रयत्न सदैव करतो. मला इच्छा असती तर विधानसभेचीही उमेदवारी मिळविली असती, असे तानावडे यांनी पुढे सांगितले.
भाजपची स्वतःची अशी एक कार्यपद्धती असते व त्यानुसारच काम चालते. लोकसभा उमेदवारीसाठी आपण इच्छुक नाही. तसेच अन्य कुणीच त्यासंदंर्भात आमच्याशी इच्छाही प्रकट केलेली नाही. निवडणुकीस अद्याप दोन वर्षे बाकी आहेत. त्यामुळे विनाकारण असे विषय उपस्थित करून उगाच गैरसमज निर्माण करण्यामागे काय कारण आहे तेच समजत नाही, असे तानावडे म्हणाले.
दरम्यान, श्रीपाद नाईक यांनीही अशाप्रकारचे वक्तव्य करणे चुकीचे आहे. पक्ष त्यांची काळजी घेत असताना ते असे का बोलले ते एक कोडेच आहे, अशा शब्दात तानावडे यांनी किंचित नाराजी व्यक्त केली.
खरे तर श्रीपाद नाईक हेच भावी उमेदवार असतील हे सर्वश्रूत आहे. त्याबद्दल कोणताही वाद नाही. अनेकदा एखादा पत्रकार किंवा हितचिंतक प्रश्न विचारतो तेव्हा काहीतरी बोलावे लागते. त्यातूनच नाईक यांनी तसे बोलले असतील, अशी सारवासारवही करण्यास तानावडे विसरले नाहीत. प्रत्यक्षात भाजपात तसा कोणताही वाद नाही. त्यामुळे श्रीपाद नाईकच उमेदवार असतील, असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.