मेट्रो कारशेड हे आरेमध्येच होणार
ऑनलाईन टीम/तरुण भारत
एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला. यांनतर शिंदे यांनी मुख्यमंत्री तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, शिंदे गट आणि भाजपचं सरकार येताच महाविकास आघाडीला धक्के द्यायला सुरुवात केली. फडणवीसांनी आरेतील मेट्रोच्या कारशेडला (Metro arey carshed) ग्रीन सिग्नल दिला. सत्तेच्या पहिल्याच दिवशी हा निर्णय घेत उद्धव ठाकरेंना धक्का दिला. आरेतच मेट्रो कारशेड होणार असल्याने पर्यावरणवादी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. तर मेट्रोला विरोध करणे म्हणजे पर्यावरणाला विरोध करण्यासारखं आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Cm Devendra Fadnavis) म्हणाले.
माध्यमांशी बोलताना आज फडणवीसांनी पुन्हा एकदा आरेतच मेट्रो असल्याचे म्हणत कारशेड होणार मेट्रोला विरोध करणे म्हणजे पर्यावरणाला विरोध करण्यासारखं आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच, मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये आतापर्यंत २५ टक्के काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे कारशेड पूर्ण करण्याकरता आता अजून झाडे कापण्याची गरज नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
आरेसंदर्भातील विरोध काही प्रमाणात खरा आहे तर, काही प्रमाणात स्पॉन्सर्ड आहे. पर्यावरणवाद्यांचा मी सन्मान करतो. आपलं म्हणणं मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतरच तो प्रकल्प सुरू झाला. मेट्रो कारशेडसाठी झाडे कापलेली आहेत. आतापर्यंत २५ टक्के काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे आता पुन्हा झाडे कापण्याची गरज नाही. पुढच्या वर्षभरात काम पूर्ण होऊन मेट्रो सुरू होऊ शकते, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की, सर्व झाडे मिळून त्यांच्या संपूर्ण आयुष्यात जितकं कार्बन शोषून घेतील तेवढं कार्बन मेट्रो ८० दिवसांच्या फेऱ्यात शोषून घेईल. म्हणूनच, सर्वोच्च न्यायालयाने आरे कारशेडसाठी परवानगी दिली. कापलेली झाडे आता पुन्हा लावता येणार नाहीत, हे माहित असूनही पर्यावरणवादी आंदोलन करत आहेत. काही पर्यावणवाद्यांना अपूर्ण माहिती असेल. काहींचं आंदोलन छद्म पर्यावरणवादी बनून स्पॉन्सर्ड असण्याची शक्यता आहे. तथापि, सर्व पर्यावरणवाद्यांचा आदर राखून त्यांच्याशी चर्चा करू, असंही फडणवीस म्हणाले.