पुणे / प्रतिनिधी :
राज्यात अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार असले, तरी या काळात आम्ही सत्तेचा कोणताही दुरुपयोग केला नाही. मी 30 ते 32 वर्ष राजकीय जीवनात असून, सत्तेमध्ये असताना पदाचा गैरवापर करून कोणालाही जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा वा अडकविण्याचा प्रयत्न केलेला नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले.
कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सध्या तपास यंत्रणाकडून राज्यात सुरू असलेल्या वेगवेगळय़ा कारवाया पाहता सुडाचे राजकारण केले जात असल्याचे पहायला मिळते. राजकीय द्वेषातून कोणी कोणाला त्रास देऊ नये, या मताचा मी आहे. काही सत्ताधारी आता महाविकास आघाडीने आम्हाला अडकविण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप करतात. मात्र, मी सत्तेत असताना कधीही कोणालाही त्रास दिला नाही. सर्वांना कायदा, संविधान समान आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्याचा विचार करून पुढे गेले पाहिजे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर यापूर्वीही दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजकारणात कधी कोण सत्तेत असते. तर कधी विरोधी पक्षात असते. राजकीय द्वेषातून कधी कोणीच त्रास देऊ नये. आत्ताच्या सत्ताधाऱ्यांकडून केले जात असलेले आरोप तथ्यहीन आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्पाबाद्दल बोलताना पवार म्हणाले, देशातील अनेक राज्याच्या निवडणुका लवकरच होतील. त्या निवडणूका ठेऊनच हे बजेट सादर केले गेले आहे. केंद्राचे बजेट हे चुनावी जुमला असल्यासारखे वाटत असल्याची टीका करतानाच सरसकट गुन्हेगारांची नावे जाहीर करून बक्षिसांची घोषणा केली, तर पोलीस यंत्रणेपुढेच प्रश्नचिन्हे निर्माण होतील. असे पायंडे पाडणे योग्य नाही. पोलिसांना न सापडणाऱ्या गुन्हेगारांबाबत अशा प्रकारे बक्षीस जाहीर करणे ठीक आहे. परंतु सरसकट बक्षीस जाहीर करणे योग्य नाही, अशी नाराजीही पवार यांनी बोलून दाखविली.
अधिक वाचा : देशासाठी फेब्रुवारीही थंडीचा
म्हणून पोस्टर लागले असतील
सत्यजित तांबे यांना विजयाची खात्री असावी. म्हणूनच त्यांचे पोस्टर सर्वत्र लागले असतील. काही जण मतमोजणीच्या आधीच मिरवणूक काढतात. कारण त्या दिवशी परवानगी नसते. यांचा गाढा आत्मविश्वास असावा. त्यामुळे त्यांनी असे केले असावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
या सगळय़ांचे ऑडिट तपासले पाहिजे
या सगळय़ांचे ऑडिट तपासले पाहिजे. नीटपणे माहिती घेतली पाहिजे. केंद्रात आणि राज्यात सहकार खाते आहे. वास्तविक गोरगरीब लोकांचा पैसा यात असतो. मोठय़ा उद्योगांचे, मोठय़ा लोकांचे व्यवहार हे राष्ट्रीयीकृत बँकेत चालतात. पण सर्वसामान्य नागरिक हा पतसंस्थेची निगडित असतो. प्रवीण दरेकर ही एक जबाबदार व्यक्ती आहेत. आमदार आहेत. एका जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्यात काही तथ्य असेल, तर सरकारने ते गांभीर्याने घेतले पाहिजे. सर्वसामान्यांच्या ठेवी आणि कर्जदार सुरक्षित राहतील अशी काळजी घेतली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
हसन मुश्रीफांनी स्टेटमेंट दिले आहे
केंद्र आणि राज्यातील चौकशा करणाऱया यंत्रणांना त्यांचे अधिकार आहेत. आता याच्या पाठीमागचे नक्की कारण काय ? सारख्या-सारख्या तिथेच का रेड पडतात. याबद्दल स्वतः हसन मुश्रीफच सांगू शकतात. काल त्यांनी स्टेटमेंट दिले आहे, असे पवार यांनी या वेळी सांगितले.