पंचगंगा प्रदुषण निर्मुलन सुकाणू समितीची बैठक; नदीकाठावरील 171 गावांचे सांडपाणी पंचगंगेत जाण्यापासून रोखा
कोल्हापूर प्रतिनिधी
पंचगंगा प्रदूषणाबाबत प्रशासन अतिशय गंभीर असून पंचगंगा नदीकाठच्या 171 गावांनी सांडपाणी थेट नदीत जाण्यापासून रोखावे. गणेशोत्सवामध्ये कोणत्याही प्रकारचे निर्माल्य, मुर्ती विसर्जीत करू नये. त्यासाठी संबंधीत अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचे प्रबोधन करावे, अशा सूचना पंचंगंगा प्रदूषण निर्मूलन सुकाणू समितीच्या आयोजीत बैठकीत प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी दिल्या.
संजयसिंह चव्हाण म्हणाले, केआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उचगाव येथे 16 कोटी रूपयांच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा आराखाडा तयार केला असून तो मान्यतेसाठी मुख्य अभियंता पुणे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. तसेच पाचगाव व कळंबा या दोन गावांसाठी शिवाजी विद्यापीठामार्फत सांडपाणी प्रकल्पाचा ‘डिटेल प्रोजेक्ट’ अहवाल तयार केला असून पुढील कार्यवाही सुरु असल्याचे प्रशासक चव्हाण यांनी स्पष्ट केले. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि पाणीपुरवठा विभागांना पंचगंगा नदीचे प्रदूषण होणार नाही याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांनी औद्योगीक, वैद्यकिय तसेच व्यावसायीक गोष्टींच्या वापरातून प्रदूषण मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यासाठी लवकरच कार्यशाळा आयोजीत करणार असल्याचे सांगितले. तर याबाबत संपूर्ण जिह्याचे प्रदूषणमुक्तीकडे गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक होणार असल्याचीही मोरे यांनी माहिती दिली.
यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे, पर्यावरण तज्ञ उदय जाधव यांच्यासह केआयटी शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.