वृत्तसंस्था/इंफाळ
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. विरेन सिंह यांनी पुढील 6 महिन्यांमध्ये शांतता प्रस्थापित होणार असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी राजीनामा का देऊ? मी काहीच चोरलेले नाही तसेच कुठला घोटाळाही केलेला नाही असे सिंह यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री विरेन सिंह यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत देत राजीनामा देण्याची कुठलीच शक्यता नसल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंसा सुरू झाल्यापासून मणिपूरचा दौरा केलेला नाही. याप्रकरणी बोलताना सिंह यांनी तणावादरम्यान पंतप्रधानांनी येथे येणे आवश्यक नव्हते असे सांगत पंतप्रधानांनी संसदेत दोनवेळा राज्यातील हिंसेबाबत भूमिका मांडली असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. कुकी आणि मैतेई समुदायांदरम्यान तडजोड घडवून आणण्यासाठी एक शिष्टमंडळ नियुक्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.