शाळा आणि शिकवणीला जाण्याचा कंटाळा असल्याने एका मुलाने स्वतःच्याच अपहरणाचा बेत रचल्याची ही घटना आहे. हरिद्वार येथे देव झा नावाच्या 11 वर्षाच्या विद्यार्थ्याने ही कहाणी रचली होती. त्यामुळे काही काळ त्याचे आईवडील आणि पोलीस यांना चिंतेने घेरले होते. हा बालक शिकवणीला जात असताना दोन अज्ञात बाईकस्वारांनी त्याचे अपहरण केले. बाईकवर बसवून ते त्याला घेऊन काही अंतर गेल्यानंतर त्याने स्वतःची सुटका करून घेतली आणि तो पळून घरी आला. त्याच्या आईवडिलांनी तोपर्यंत पोलिसांना अपहरणाची माहिती दिली होती.
बालक परत आल्यानंतरही पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा शोध सुरू ठेवला. ज्या मार्गावरून या मुलाचे अपहरण करण्यात आले होते, त्या मार्गावरून बराच काळ पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. स्प्लेंडर गाडीवरून आपल्याला नेण्यात आले, असे या मुलाने पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार स्प्लेंडर दुचाक्मयांचा शोध पोलिसांनी सुरू केला. पोलिसांनी दोन डझनहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱयांचे फुटेजही मागविले. सीसीटीव्ही फुटेजमधून खरी घटना उघड झाली. या मुलाचे कोणीही अपहरण केले नव्हते. तो एकटाच चालत दूर अंतरावर गेला होता आणि तेथून परत घरी आला. नंतर पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारले असता, त्याने सत्य कबूल केले. त्याला शिकवणीला आणि शाळेला जाण्याचा कंटाळा होता. शिकवणीला जाताना अपहरण झाल्याचे पाहून आईवडील शिकवणी बंद करतील, अशी त्याची समजूत होती. म्हणून त्याने स्वतःचे अपहरण झाल्याचा बनाव रचला होता. हे ऐकून पोलिसांसह त्याचे आईवडील अक्षरशः अवाक् झाले. ही कल्पना त्याला कुठून सुचली, असे विचारले असता त्याने एका चित्रपटात हे पाहिल्याचे सांगितले. आईवडिलांनी मुलांवर अभ्यासाची नको इतकी सक्ती करू नये, असा संदेश या घटनेतून मिळतो, असे नंतर या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी अजय सिंह यांनी सांगितले.