एलअॅण्डटीच्या कारभाराबद्दल नागरिकांचा आक्रोश : 30 एप्रिलपर्यंत मुदत असतानाही मार्च महिन्याच्या अखेरीस बिल भरण्याची सूचना
बेळगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयामध्ये मुबलक पाणीसाठा असूनही जलवाहिन्यांच्या गळत्यांमुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मागील अडीच महिन्यांत केवळ 15 दिवस पाणीपुरवठा करण्यात आला आहे. पाण्याचा पत्ता नाही, मात्र एलअॅण्डटी कंपनीला एप्रिल महिन्याची पाणीपट्टी अॅडव्हान्स हवी आहे. याबाबत नागरिकांना बिले देण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून काही ठिकाणी 10 ते 15 दिवस तर काही ठिकाणी 20 दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेषत: दक्षिण भागात आणि शहराच्या मध्यवर्ती भागात पाणीटंचाईची समस्या बिकट बनली आहे. सध्या टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने संपूर्ण शहरात एलअॅण्डटीच्या नावाने शिमगा होत आहे. एलअॅण्डटी कंपनीच्या पाणीपुरवठा नियोजनाला शहरवासीय कंटाळले असून मंगळवारी एकाचदिवशी अनगोळ आणि राणी चन्नम्मानगरमधील रहिवाशांनी पाण्यासाठी मोर्चा काढला. या मोर्चावेळी एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य बनविण्यात आले. सध्या पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने एलअॅण्डटीच्या कारभाराबद्दल आक्रोश वाढला आहे. प्रत्येक परिसरात पाणीटंचाईची झळ बसू लागल्याने एलअॅण्डटी कंपनी कारणीभूत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. 1 जानेवारी ते 15 मार्चपर्यंत बापट गल्ली परिसरात केवळ 15 दिवस पाणीपुरवठा करण्यात आला. तोदेखील अपुरा होत असल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वेळेत आणि मुबलक पाणीपुरवठा केला जात नाही. पाणीपट्टी बिले मात्र वेळेवर दिली जातात आणि वेळेवर वसुली करण्यासाठी मोहीमदेखील राबविली जाते. बिले वेळेत भरली नसल्यास दंडात्मक कारवाईचा बडगादेखील उगारला जातो. मग पाणीपुरवठा वेळेत न करणाऱ्या कंपनीवर कारवाई का करू नये? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. महिन्याभरात केवळ सहा दिवस पाणीपुरवठा होत असून महिन्याच्या अखेरीस 175 ऊपये बिल भरावे लागते. दोन महिन्यांतून एकदा पाणीपट्टी भरून घेतली जात असल्याने 350 ऊपये भरावे लागतात. पण आता एलअॅण्डटी कंपनीने एप्रिल महिन्याची पाणीपट्टी मार्च महिन्यातच वसूल करण्याचा सपाटा चालविला आहे. बिल भरण्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत असतानाही मार्च महिन्याच्या अखेरीस बिल भरण्यासाठी नळधारकांना बिले देण्यात आली आहेत.
30 मार्चपर्यंत बिल भरण्यासाठी दबाव
पाण्याचा पत्ता नाही, मात्र एलअॅण्डटीला पाणीपट्टीची रक्कम आगाऊ हवी आहे. या कंपनीच्या कारभाराबद्दल शहरवासियांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. वेळेवर पाणीपुरवठ्याच्यादृष्टीने सुधारणा करण्याची गरज असताना नागरिकांकडून पैसे वसूल करण्यावर भर दिला जात आहे. बापट गल्ली परिसरातील नळधारकांना एप्रिल महिन्याचे बिल वितरित करण्यात आले असून 30 मार्चपर्यंत बिल भरण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. एलअॅण्डटीने प्रथम पाणीपुरवठा सुरळीत करावा, त्यानंतरच नागरिकांकडून बिल वसूल करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.